मुंबई - राज्यातील शाळांमध्ये 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत "स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे.
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत "स्वच्छ भारताचे ध्येय' साध्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने क्षेत्रीय पातळीवर आदेश दिले आहेत. यामध्ये सर्व शाळांत संस्थांनी "स्वच्छता शपथ'चे आयोजन करायचे आहे. यामध्ये शिक्षक, कर्मचारी यांनी सहभागी व्हायचे आहे; तसेच या पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ किंवा पालक व शिक्षकांमध्ये बैठका आयोजित करून मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व विशद करणे, मुलांना घरामध्ये-शाळेत स्वच्छता राखण्यास प्रवृत्त करणे, विद्यार्थी, शिक्षक, पालक यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, स्वच्छतेविषयी वेगवेगळे संदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, स्वच्छतेवरील गीतांचे आयोजन; तसेच स्वच्छतादूत शाळांत नेमणे आदी उपक्रम यानिमित्ताने प्रत्येक शाळांत राबवले जाणार आहेत.
|