मुंबई - नवीन शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेतील एक लाखाहून अधिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. राजकीय आणि आर्थिक हस्तक्षेप टाळण्यासाठी या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी दिली.
राज्य सरकारच्या 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला असून, आता शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. ती संपूर्णपणे पारदर्शकपणे होणार आहे. त्यामुळे या बदल्यांमध्ये शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुंडे म्हणाल्या, की राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून ते नव्याने तयार केले असून, या धोरणाला काही संघटनांनी विरोध दर्शवून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, शिक्षकांच्या बदल्या या धोरणानुसारच व्हाव्यात, असे मत व्यक्त करून या धोरणाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील मार्ग सुकर झालेला आहे.
नवे धोरण...
- बरीच वर्षे घरापासून दूर असलेल्या शिक्षकांची दखल
- अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना योग्य ठिकाणी बदलीचा हक्क
- अंपग महिला, दुर्धर आजार आणि माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नींना प्राधान्य
- ऑनलाइन अर्ज करताना 20 पर्याय द्यावे लागणार
- या पर्यायांनुसार नियुक्ती देण्याचा प्रयत्न
- आदेश मे महिन्यात देण्याची शक्यता
ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी संघटनांच्या मागण्या आणि सूचनांची दखल घेऊन बदलीप्रक्रियेत कोणताही शिक्षक आपल्या घरापासून दूर राहणार नाही. सर्वांना सामान न्याय दिला जाईल. या वर्षी 1 लाखाहून अधिक शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. त्या 100 टक्के पूर्ण केल्या जाणार आहेत.
- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री
|