पुणे/नागपूर - विदर्भ आणि वऱ्हाडसह उत्तर महाराष्ट्रात आज पाऱ्याने उसळी मारली. चंद्रपूरला सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 44.1, नागपूरला 43.2, जळगावला 43 तर मालेगावला 42 अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात बहुतेक ठिकाणी तापमान 40 अंशांवर होते. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रात पुण्यासह काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या असल्यातरीही उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढला होता. गेल्या दोन दिवसांपासून सरासरी इतका नोंदला जाणारा कमाल तपामानाच्या पाऱ्याने उसळी घेतली आहे. उद्या (ता. 18) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. सकाळी कडक उन्हानंतर दुपारी ढग गोळा होऊन गारपिटीसह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी दुपारनंतर उकाड्यात मोठी वाढ झाली होती. पुणे, सातारा जिल्ह्यांत गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात तुरळक गारपीट झाली. तर साताऱ्यातील खटाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या.
प्रमुख शहरांतील तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे -
पुणे - 39.3, नगर - 42.1, नाशिक - 40.2, सोलापूर - 41, औरंगाबाद - 40, परभणी - 42, वर्धा - 44, यवतमाळ - 42.5
ब्रह्मपुरी - 42.0, गडचिरोली - 42.0, वाशीम - 41.6, गोंदिया - 40.8
|