
Narayan Rane : 'त्यांचा तर तोच धंदा...' विनायक राऊत राणे कुटुंबावर बरसले
मुंबईः रामनवमीच्या दरम्यान राज्यामध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलं होतं. राणेंच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यामध्ये रामनवमीच्या दरम्यान हिंसेच्या घटना घडल्या, त्यावर विधान केलं होतं. छत्रपती संभाजी नगर, मालवणी येथील घटनांवर बोलतांना शरद पवार म्हणाले की, राज्यातली परिस्थिती चिंताजनक आहे. या घटना धार्मिक कारणामुळे घडल्या असतील तर परिस्थिती भीषण आहे, असं पवार म्हणाले होते.
त्यावर बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, बोलतांना संयम असायला हवा. बोलण्यातून कुणाचीही मनं दुखावली जाणार नाहीत, याचा विचार करणं गरजेचं आहे. पवारांनी चिंता व्यक्त केली असली तरी आता त्यांचं सरकार राहिलेलं नाही. त्यांचं सरकार असतांनी लोक चिंतेत होते कारण राज्याला मुख्यमंत्री नव्हता. जे होते ते 'मातोश्री'चे मुख्यमंत्री होते.
नारायण राणेंनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. नारायण राणे आणि त्यांच्या दोन पोरांना आता एवढाच धंदा राहिला आहे. 'मातोश्री'च्या नावाने डराव-डराव करायचं आणि भाजमध्ये स्वतःला सिद्ध करायचं एवढंच त्यांचं काम असल्याचं राऊत म्हणाले.