Jitendra Awhad: "…तर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करणार", उपमुख्यमंत्र्यांचा थेट इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad and Devendra Fadnavis

Jitendra Awhad: "…तर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करणार", उपमुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात मोठा गोंधळ सुरू झाला आहे. काहींनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर आक्षेप घेतला तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे.(Marathi Political News)

चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं काल जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल', असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना “चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे” या जितेंद्र आव्हाडांच्या वक्ताव्याबाबत विचारलं असता ते म्हणाले कि, “जितेंद्र आव्हाड जर असं काही बोलले असतील, तर ते अतिशय चुकीचं आहे. अशाप्रकारे बोलणं बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. पण यामुळे इतर समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे, विशेषत: हिंदू समाजात… हे जितेंद्र आव्हाडांना कळत नाही. त्याचं वक्तव्य तपासून पाहिलं जाईल, त्यांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल”,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. (Marathi Political News)

काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड?

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. धर्मांतर करून इसिस संघटनेत गेलेल्या महिलांचा अधिकृत आकडा तीन आहे, तरीही चित्रपटात हा आकडा ३२ हजार इतका दाखवला आहे. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे असं त्यांनी म्हंटलं आहे.(Marathi Political News)