कर्जमाफीसाठी हवेत 30 हजार कोटी 

कर्जमाफीसाठी हवेत 30 हजार कोटी 

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच शेतकरी कर्जमाफीचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याने येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात यापैकी 25 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. 

कर्जमाफीसाठी सुमारे 30 हजार कोटींची आवश्‍यकता असल्याचे वित्त विभागातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेतील 6 हजार कोटी रुपये तिजोरीत शिल्लक आहेत, त्यात 25 हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत ही रक्कम जमा केली जाईल. 

निवडणुकीआधी या तिन्ही पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. तसेच वेगवेगळी विचारधारा असलेल्या या तीन पक्षांनी एकत्र येताना किमान समान कार्यक्रम निश्‍चित केला आहे. यातही राज्यातील शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, त्याची सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून होत आहे. 

फडणवीस सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. यातील सुमारे 18 हजार 891 कोटींचेच वाटप झाले असून, सहा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. 

राज्यातील शेतकऱ्यांवर विविध जिल्हा सहकारी बॅंका, राष्ट्रीयीकृत तसेच व्यापारी बॅंका यांचे सुमारे 30 हजार कोटी कर्ज असावे, असा अंदाज आहे. यात पीक कर्ज, लहान-मध्यम मुदतीचे शेती कर्ज यांचाही समावेश आहे. राज्याच्या कृषी, सहकार आणि वित्त विभागातील उच्चपदस्थांच्या मते सध्याच्या घडीला कर्जमाफीसाठी 30 हजार कोटी लागतील, असा अंदाज असला, तरी त्यात थोडेफार कमी-अधिक होऊ शकते, हे गृहीत धरून आवश्‍यक आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे. 

फडणवीस सरकारने आतापर्यंत 44 लाख शेतकऱ्यांना 18,891 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. त्या कर्जमाफीपोटी तेव्हा 24 हजार कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी सहा हजार कोटी अद्यापही शिल्लक आहेत, अशी माहिती नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारी बैठकीत समोर आली. म्हणून मार्च 2020 मध्ये अर्थसंकल्पात 25 हजार कोटींची तरतूद करून त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा विधिमंडळात केली. 

दरम्यान, ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात क्‍यार आणि महा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या अवकाळी पावसाचा राज्यातील 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्‍यांना मोठा फटका बसला आहे. पंचनाम्यात सुमारे 93 लाख हेक्‍टरवरील शेती पिके आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सुमारे एक कोटी तीन हजार शेतकरी संकटाने भरडले आहेत. त्यांनाही तातडीने मदत देण्याबाबतची तयारी करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे हा किती आर्थिक भार तिजोरीवर पडेल याचीही आकडेमोड सुरू आहे. 

- फडणवीस सरकारची कर्जमाफी - दीड लाखांची मर्यादा,  24 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 891 कोटींचे वाटप. 
- ठाकरे सरकारची कर्जमाफी - दोन लाखांची मर्यादा. 
- फडणवीस सरकारच्या योजनेत पात्र न ठरलेले शेतकरी ठाकरे सरकार योजनेत पात्र असतील. 
- फेब्रुवारी-मार्चच्या अर्थसंकल्पात आवश्‍यक निधीची तरतूद होणार : 25 हजार कोटी. 
- कर्ज रकमेचे वितरण - मार्च 2020 पासून. 
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना असेल, यात संबंधित शेतकऱ्यांना अंदाजे 40 ते 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com