गणनेनंतरची आकडेवारी प्रसिद्ध; संख्या वाढली
मुंबई - देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने वाघांच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
भारतीय वन्यजीव संस्थानमार्फत व्याघ्रगणना केली जाते. यापूर्वी मर्यादेत पाणवठ्यांवरील वाघांची मोजणी केली जायची. नवीन पद्धतीनुसार चार फेज कॅमेऱ्यांमार्फत 45 दिवस पाहणी करून वाघांची संख्या ठरविण्यात आल्याने ती अचूकतेच्या अधिक जवळ असल्याचा दावा केला जात आहे. त्यादृष्टीने राज्यात सर्वच व्याघ्र प्रकल्पांसह इतरही गणना झालेल्या भूभागातील वाघ आणि वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे, खुणा आणि विष्ठांचे नमुने, कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रांच्या आधारे व्याघ्रगणता करण्यात आली आहे. डिसेंबर 2017 पासून राज्यात व्याघ्रगणनेला सुरवात झाली होती. त्याचा अधिकृत अहवाल येत्या काही दिवसांत प्रसिद्ध केला जाणार आहे.
राज्यात 2014 च्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार 190 वाघ होते. मात्र, गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या 55 ने वाढली आहे. याविषयी मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, 'वाघांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही जाणीवपूर्वक काम केले आहे. जंगलातली घनता वाढावी, तृणभक्षी जनावरे जंगलात असावीत, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. वाघांची संख्या वाढणे, हे आमच्या मिळालेल्या प्रयत्नांना आलेले यश आहे.''
राज्यात दोन वर्षांच्या आतील वाघांच्या बछड्यांची संख्याही 250 असली, तरी त्यांची गणती व्याघ्रगणनेत करण्यात आलेली नसल्याचे समजते.
वाढती संख्या...
वर्ष - देशातील - राज्यातील संख्या
2010 - 1700 - 169
2014 - 2226 - 190
2018 - 2500 - 245
|