अपघातग्रस्तांसाठी आता जागोजागी मृत्युंजय देवदूत ! नऊ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा; वर्षात 12 हजार मृत्यू 

Accident
Accident

सोलापूर : राज्यात जानेवारी 2020 ते जानेवारी 2021 या काळात तब्बल 26 हजारांहून अधिक अपघातात 12 हजार 869 जणांचा जीव गेला आहे. राज्यातील ब्लॅक स्पॉटची (अपघातप्रवण ठिकाणे) संख्या कमी होऊनही अपघातांची संख्या मात्र, वाढलेलीच आहे. त्यात पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, नाशिक, नगर, पालघर, जळगाव, कोल्हापूर, सातारा, बीड या नऊ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 

अपघातांची संख्या अथवा अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. मात्र, मागील दहा-बारा वर्षांत ना अपघात कमी झाले ना अपघाती मृत्यू. या पार्श्‍वभूमीवर आता महामार्गांवरील अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून 1 मार्चपासून "महामार्ग मृत्युंजय देवदूत' उपक्रम राबविला जात आहे. 

दरवर्षी देशभरात सुमारे दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील मॉल, पेट्रोलपंप, ढाबे, हॉटेलमधील कर्मचारी, संबंधित गावातील नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. तर अपघातातील जखमींना स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचाही लाभ दिला जाणार आहे. मदत करणाऱ्यांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून जखमींना मदत मिळावी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, अपघाती जिल्ह्यांमधील अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन त्यानुसार उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

आजपासून राज्यभर "मृत्युंजय देवदूत' 
राज्यातील अपघातांची संख्या कमी व्हावी, अपघातानंतर जखमींना तत्काळ उपचार मिळावेत म्हणून ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. आजपासून (ता. 1) राज्यभर "मृत्युंजय देवदूत' ही योजना राबविली जात आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास निश्‍चितपणे अपघात कमी होऊन कुटुंबाची वाताहत थांबेल, असा विश्‍वास आहे. 
- भूषणकुमार उपाध्याय,
अप्पर महासंचालक, राज्य महामार्ग 

अपघाताची स्थिती (जानेवारी 2020 ते जानेवारी 2021) 

  • एकूण अपघात : 26,238 
  • एकूण ब्लॅक स्पॉट : 1,103 
  • अपघाती मृत्यू : 12,869 
  • गंभीर जखमी : 14,172 

अपघाताची नेमकी कारणे... 

  • महामार्गांवरील लहान-मोठ्या वाहनांचा वाढला वेग 
  • विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे प्रकार ठरतात जीवघेणे 
  • महामार्गांवर लोकांनी सोयीसाठी दुभाजक तोडल्याने वाढले अपघात 
  • महामार्गांवर विविध प्रकारच्या वाहनांची वाहतूक; मोठ्या वाहनांना नाहीत रिफ्लेक्‍टर 
  • मद्यपान करून, मोबाईलवर बोलत, सीटबेल्ट न लावता वाहन चालविल्यानेही वाढले अपघाती मृत्यू 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com