मुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोत अशी अवस्था झाल्याने तुकाराम मुंढे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
तुकाराम मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, नवी मुंबई आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त आणि पुणे- पिंपरी चिंचवड परिवहन सेवेचे प्रमुख म्हणून मुंढे यांचा सत्ताधारी पक्षांसोबत कायम वाद झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे राज्यभरातून आम्हाला मुंढे नकोत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होत आहे. नाशिकमधील मुंढे यांचा वाद टोकाला पोचला असताना राज्य सरकारने त्यांची बदली मंत्रालयात अर्थ व नियोजन विभागाच्या सहसचिवपदावर केली. मात्र 22 नोव्हेंबरपासून मुंढे मंत्रालयाकडे फिरकले नाहीत. वास्तविक आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर तातडीने नवीन पदभार स्वीकारण्याचा नियम आहे.
अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे मुंबईपासून दूरवरच्या ठिकाणाहून बदली झाल्यास आठ ते दहा दिवसांपर्यंत पदभार स्वीकारणे बंधनकारक आहे. मात्र, मुंढे यांच्या बदलीला एक महिना होत असताना त्यांनी पदभार स्वीकारला नाही. विशेष म्हणजे राज्य सरकारला त्यांनी गैरहजेरीबाबत अद्यापपर्यंत कोणतेही कारण कळविले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द पाहता त्यांना मंत्रालयाच्या बाहेरच नियुक्ती हवी आहे. मंत्रालयातील सहसचिव पदावर नेमणूक म्हणजे साइड पोस्टिंग समजली जात असल्याने मुंढे मंत्रालयाकडे फिरकले नाहीत. तसेच, मुंढे यांनी मंत्रालयातील पदभार स्वीकारलाच तर अनेक फाइलींची अडवणूक होऊ शकते, या भीतीने त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नको असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अशा या त्रांगड्यामुळे महिनाभरापासून मुंढे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले.
|