मुंबई - राज्यात या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी "नाफेड'ची अंतर मर्यादेची अट असली, तरी खरेदी केंद्रे सर्वत्र सुरू करावीत, शेतकऱ्यांचे चुकारे सात दिवसांच्या आत देण्यात यावेत. संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिल्या.
"वर्षा' निवासस्थानी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सुरू असलेल्या तूर खरेदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. फडणवीस म्हणाले, 'राज्यात जिथे भारतीय अन्न महामंडळाची खरेदी केंद्रे सुरू आहेत तेथे "नाफेड'ने खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत.'' गोदामांची क्षमता वाढविण्यासाठी गोदामांचे "मॅपिंग' करून ज्या ठिकाणी खासगी गोदामाची आवश्यकता आहे तिथे ती सुरू करावीत, अशा सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी तूर खरेदीसंदर्भात सर्व संबंधितांनी "मिशन मोड' म्हणून तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
पणन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, 'खरेदी केंद्राचा कालावधी वाढविण्यासंदर्भात आणि अंतर वाहतूक करण्याची परवानगी मिळण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, तसेच वखार महामंडळाने पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्था यांची गोदामे तूर खरेदी साठवणुकीसाठी घेण्यात येत आहेत, ज्या ठिकाणी बारदाने उपलब्ध नाहीत तेथे बारदानापुरवठा करण्यात येत आहे.''
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी उपस्थित होते.
|