अन् कुस्तीतले वस्ताद शरद पवार यांनी 'गदा' जिंकली : उद्धव ठाकरे

SHIVSENA
SHIVSENA

मुंबई : विधानसभा निकाल काल जाहीर झाले आहेत. भाजप-सेनेला जनतेने हवा तेवढा पाठिंबा दिल्याचे दिसत नाही. सेना-भाजपने घेतलेल्या आयात केलेल्या आयारामांना जनतेनं  स्वीकारलं नाही. तसेच भाजप 122 वरून 102 वर घसरला, तर शिवसेनेलाही जवळपास 7 जागांचा फटका बसला. दरम्यान, त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावरही आसूड मारल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाचाही पुन्हा कस लागला. खरंच ते जिद्दीने लढले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःला महाराष्ट्रातील तेल लावलेला पहिलवान म्हणून घोषित केले; पण मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे की ते तेल थोडे कमी पडले व मातीतल्या कुस्तीतले वस्ताद म्हणून शरद पवार यांनी गदा जिंकली, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय- जनतेने कौल दिला आहे. तो स्वीकारून आम्ही महाराष्ट्राला आज आहे त्यापेक्षा निश्चितच पुढे घेऊन जाऊ. हे राज्य शिवरायांचे आहे. त्यामुळे जो कौल जनतेने दिला त्यामागे शिवरायांची प्रेरणा नक्कीच असेल. महाराष्ट्राच्या जनतेला सत्तेचा उतमात मान्य नव्हता आणि नाही. आमचे पाय जमिनीवरच होते आणि आहेत. आमचे हे राज्य शिवरायांच्या प्रेरणेनेच चालेल महाराष्ट्राच्या जनतेचा कौल स्पष्ट आणि सरळ आहे. उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, असा जनादेश देणारा निकाल ईव्हीएममधून बाहेर आला. ईव्हीएममधून फक्त कमळेच बाहेर येतील असा आत्मविश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होता.

64 पैकी 63 ठिकाणी कमळे फुलली नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल पाहता शिवसेना-भाजपा युतीस सरकार स्थापन करण्याइतके बहुमत मिळाले आहे. आकड्यांचा खेळ संसदीय लोकशाहीत चालत असतो. युती;चा आकडा स्पष्ट बहुमताचा आहे. शिवसेना आणि भाजपा मिळून 160 च्या आसपास आकडा आला. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवून दिलेला हा निकाल आहे. मग त्यास महाजनादेश म्हणा नाही तर आणखी काही. हा जनादेश आहे. महाजनादेश नाही हे मान्य करावे लागेल. जनतेचा कौल स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा दाखवावाच लागतो.

आम्ही हा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे . महाराष्ट्रात 2014 पेक्षा वेगळा निकाल लागला आहे. 2014 साली; नव्हती. 2019 साली; युती; असतानाही जागांची घसरण झाली. बहुमत मिळाले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून शंभर जागांचा टप्पा गाठला. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून मतदारांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली . हा एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना मिळालेला धडा आहे . धाक, दहशत, सत्तेची मस्ती यास बळी न पडता जनतेने जे मतदान केले त्याबद्दल तिचे अभिनंदन! काँग्रेसला कोणतेही नेतृत्व नव्हते. त्या बिनधडाच्या काँग्रेसला राज्यात 44-45 च्या आसपास जागा मिळाल्या.

दरम्यान, भाजपानं राष्ट्रवादी अशी काही फोडली की, हा पवारांचा पक्ष थाेडा तरी शिल्लक राहील काय, असे वातावरण झाले हाेते. पण कालच्या निकालात महाराष्ट्रात सर्वात जास्त उसळी राष्ट्रवादीने मारली आहे व त्यांनी पन्नाशी पार केली. भाजप 122 वरून 102 वर घसरला. शिवसेना 63 वरून खाली आली. याशिवाय इतरही अपक्ष, बंडखोर, छोटे पक्ष मिळून पंचवीस जणांना विजय मिळाला आहे. तसे म्हटले तर हा कौल अधांतरी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर; फार शहाणपणा करू नका . उतू नका, मातू नका. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा; असा जनादेश राज्याच्या जनतेने दिला आहे.

तसेच पक्ष फोडून व पक्षांतरे घडवून मोठा विजय मिळवता येतो हा भ्रमाचा भोपळा राज्याच्या जनतेने फोडला. पक्षांतरे करून तसेच सारख्या टोप्या बदलणाऱ्यांना जनतेने घरी पाठवले आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव झाला. शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजे यांचे वर्तन नीतिमत्तेचे असायला हवे होते. सातारची गादी छत्रपती शिवरायांची म्हणून मानसन्मान आहे. छत्रपतींचे नाव घेऊन कुणी अल्टी-पल्टी करत असेल तर चालणार नाही हे सातारकरांनी दाखवून दिले. तसेच सातारकरांनी त्यांच्या मनातला राजा म्हणूून शरद पवारांना स्थान दिल्याचे कालच्या निकालाने सिद्घ झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com