गेल्या साधारण ८ ते ९ दिवसांपासून राज्यामध्ये सातत्याने नाट्यमय घडामोडी घडत आहेत., शिवसेनेतलं ऐतिहासिक बंड, त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वाढलेल्या हालचाली आणि देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवाऱ्या या सगळ्याची परिणती महाविकास आघाडी सरकार पडण्यात झाली. जे अपेक्षित होतं. पण हे सगळं केवळ ८- ९ दिवसांत घडलेलं नाहीये.
हे बंड होणं, शिवसेनेचे इतके आमदार फुटणं हे सगळं नक्कीच एका दिवसांत घडलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) राजीनामा देणं हे निश्चितच उत्फुर्त नव्हतं. यामागे विरोधी पक्षनेते आणि नव्याने 'चाणक्य' म्हणवले जाणारे देवेंद्र फडणवीस निश्चितच होते. राज्यसभेच्या निवडणुकीच्या विजयापासूनच त्यांनी ही तयारी सुरू केली होती. राज्यसभेतला विजय हा हे सरकार पाडण्यातला केवळ पहिला टप्पा होता. विधान परिषद निवडणूक हा दुसरा टप्पा आणि नंतर तिसरा टप्पा म्हणजे सरकार पाडणं जे आता भाजपाला शक्य झालं. ते कसं? फडणवीसांनी असे काय फासे टाकले?
काय झालं राज्यसभा निवडणुकीत?
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस रंगली होती. भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार आमनेसामने होते. यात महाडिकांना पहिल्या पसंतीची २७ मतं होती. म्हणजे १०६ भाजपाची, ६ अपक्ष आणि मनसेचा १ अशी एकूण ११३ आमदारांशिवाय १० मतं जास्त होती. त्यामुळे आता ही मतं मविआच्या गोटातून गेली हे स्पष्ट होतं. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत तर भाजपाचा विजय निश्चित होता. त्यांनी आधीच ४१ मतांचा कोटा बाजूला ठेवला आणि गोयल, बोंडेंना विजय मिळाला. तर दोघांच्यातली ७ - ७ अशी मिळून १४ मतं महाडिकांना पडली आणि २७ अधिक १४ असं ४१ मतं मिळवत महाडिक निवडून आले आणि भाजपाने डाव जिंकला.
विधान परिषद निवडणुकीतलं भाजपाचं समीकरण काय?
भाजपाकडे १०६ मतं असतानाही १३४ मतं मिळवत महाविकास आघाडीची काही मतं फोडण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपाकडे एकही मतदार नव्हता, पण तरीही लाड काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजयी झाले. मविआची जवळपास १० मतं फोडण्यात फडणवीस यशस्वी झाले.
शिवसेनेचं ऐतिहासिक बंड
विधान परिषदेचा निकाल लागताच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सूरतकडे रवाना झाल्याची माहिती बाहेर आली. त्यांच्यासोबत एक एक करत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फुटले आणि सूरतला निघून गेले. अनेक अपक्षही त्यांच्यासोबत होतेच. तिथून आसाममधल्या गुवाहाटीला जाणं, तिथला ९ दिवसांचा मुक्काम, राज्याच्या पोलिसांचं संरक्षण या सगळ्यामागे भाजपा असल्याचं ठळकपणे दिसत होतं. हा गट आता गोव्यात गेला आहे. ही तिन्ही राज्यं भाजपाशासित आहेत. या राज्यांमधल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या आमदारांना अगदी रोज घालायचे कपडे ते पोलिसांचं, केंद्राचं संरक्षण अशा प्रत्येक सोयी पुरवल्या.
या बंडाच्या काळात फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्यांनाही वेग आला. अमित शाह, जे.पी.नड्डांच्या भेटी घेणं, या सगळ्याचं सत्र फडणवीसांनी सुरूच ठेवलं. दरम्यान, शिवसेनेचे आठ मंत्री शिंदे गटात आले. करेक्ट वेळ साधून त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मविआकडे बहुमत नाही, त्यांना बहुमत सिद्ध करण्याची मागणी राज्यपालांकडे केली. त्यानंतर तातडीने राज्यपालांनी अधिवेशन बोलावलं आणि सगळ्या घटनांना वेग आला. अखेर राज्यपालांच्या सूचनेनंतर शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालय गाठलं. मात्र तिथंही त्यांना हार पत्करावी लागली आणि अखेर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घोषणा करत राजीनामा दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.