मुंबई - आजपर्यंत प्रसार माध्यमे सरकारवर लक्ष, वचक ठेवत होती; पण आता सरकारच प्रसार माध्यमांवर लक्ष ठेवत असून, ही दुसरी आणीबाणी येत असल्याचे संकेत आहेत, अशी टीका करतानाच प्रसार माध्यमांनीच ही आणीबाणी मोडून काढायला हवी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या "आचार्य अत्रे' पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी उद्धव बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आक्रमक शब्दांत टीका केली. सामान्य जनतेचा आवाज म्हणजे पत्रकारिता असते. पत्रकारिता हे सरकारवर लक्ष ठेवणारे आयुध असते; पण आयुध असणाऱ्या या लेखणीला गंज लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमची लेखणी कशी गंजवायची, यामधे राज्यकर्ते तरबेज असतात. गंजलेली आयुध पत्रकारांच्या हाती देऊन लढा उभा कसा करणार, असा सवाल ठाकरे यांनी या वेळी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रसार माध्यमांवर बोलायचे तेव्हा सगळेच टीका करायचे; पण आता सगळे गप्प का? असा सवाल करत ठाकरे यांनी पुण्यप्रसून वाजपेयी यांना एका वाहिनीवरून काढण्यात आल्याचा दाखला दिला.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यंदाचा "आचार्य अत्रे' पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांना प्रदान करण्यात आला.
पगड्यांचे राजकारण कशासाठी?
उद्धव ठाकरे यांनी पगडी व टोपी यांच्या राजकारणावरही टीका केली. महात्मा फुलेंच्या पगडीचे राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे काय, असे टीकास्त्र सोडताना त्यांनी पगडी व टोपीचे राजकारण करणाऱ्यांच्या डोक्यांचा आकार तरी तेवढा आहे काय, असा टोला लगावला.
|