शिवसेनेत नाराजीचा स्फोट 

shivsena
shivsena

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याची चर्चा आहे. याच नाराजीचा पहिला स्फोट झाला असून, माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा "मातोश्री'कडे फिरकणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. सर्व नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या आमदारांनी अजून उद्धव ठाकरेंची वेळ मागितलेली नाही. याशिवाय मंत्रिमंडळातील सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्यानेही शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. विस्ताराच्या दिवशी आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने ते आणि त्यांचे बंधू शिवसेना खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आपण नाराज नसल्याचे संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रामदास कदम हेदेखील आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. यासंदर्भात रामदास कदम यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तसेच भास्कर जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांनी तर उघड नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या तानाजी सावंत यांनी आज "मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी ठाकरे यांनी त्यांना समजावल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परंतु, ठाकरे यांच्याकडूनही न्याय मिळाला नसल्याने सावंत पुन्हा "मातोश्री'वर फिरकणार नसल्याचे सावंत यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, असे डझनभर आमदारांना वाटत होते. त्यात सुनील प्रभू, रवींद्र वायकर, सुनील राऊत, रामदास कदम, दिवाकर रावते, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, दीपक केसरकर, प्रकाश अबिटकर, अनिल बाबर, तानाजी सावंत, संजय शिरसाट, संजय रायमुलकर, आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे. मात्र, त्यांना संधी मिळाली नसल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. 

खासदार भावना गवळी नाराज 
वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनीही संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून नाराजी व्यक्त केली. संजय राठोड यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भावना गवळींना उमेदवारी मिळू नये, यासाठी खूप प्रयत्न केले, अशी चर्चा आहे. मात्र, उमेदवारी मिळवून त्या विजयीही झाल्या. या वेळी गवळी यांनी बुलडाण्याचे संजय रायमूलकर आणि अकोल्याचे संदीप बाजोरिया यांना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, उद्धव यांनी गवळी यांचे विरोधक असलेल्या संजय राठोड यांनाच कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केली. 

मंत्रिपदे कुणाला द्यायची, याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे. पक्ष आणि सरकारच्या हिताचा निर्णय ते घेतात. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे मी नाराज झालो असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. 
- दीपक केसरकर 

मला मंत्रिपद देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही अपेक्षा होती. मात्र पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. सत्तेमध्ये मी नाही; पण सत्ताधारी पक्षात मी आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारणार आहे, की मी कुठे कमी पडलो? माझी काय चूक आहे? आपल्या मनात माझ्याबद्दल राग आहे का? उद्धव ठाकरेंची वेळ मागितली आहे. 
- भास्कर जाधव 

कदाचित आपली निष्ठा कमी पडली असेल, तर आगामी काळात ती दाखवून देऊ. 
- प्रताप सरनाईक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com