उरीतील हल्ल्यात महाराष्ट्रातील चार जवान हुतात्मा

उरीतील हल्ल्यात महाराष्ट्रातील चार जवान हुतात्मा

श्रीनगर - उरी येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 17 जवानांमध्ये महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा जवानांमध्ये जवान संदीप सोमनाथ ठोक (21, खडांगळी, ता.सिन्नर, जि.नाशिक), चंद्रकांत शंकर गलांडे (27, जाशी, ता. माण जि. सातारा), जानराव उईके (26, नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) व विकास जनार्दन कुळमेथे (नेरड, ता. वनी, जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे.
 

तिघा हुतात्म्यांची पार्थिव आज पुण्याला विमानाने आणण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे. तर विकास कुळमेथे यांचे पार्थिव उद्यापर्यंत त्यांच्या जन्मगावी पोहोचेल, असे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेले यांचा उपचारादरम्यान आज (दि. 19) मृत्यू झाला. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

संदीपचे संसाराचे स्वप्न अधुरे
घरची परिस्थिती सामान्यच असताना सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या जवान संदीप ठोक यांचे संसाराचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
नाशिक जिल्ह्यातील खडांगळी गावात संदीप यांचे कुटुंब शेतात राहते. घरची सामान्य परिस्थिती असलेले संदीप यांचे वडील टेलरिंगचे काम करून शेती करतात, तर त्यांचा मोठा भाऊही शेती करतो. संदीप हे सिन्नरमधील पाचवे हुतात्मा जवान आहेत. संदीप यांचे लग्न दिवाळीनंतर होणार होते. दोन महिन्यांपूर्वी ते आपल्या गावी आले होते. त्यानंतर ते पाच जुलैला पुन्हा कामावर रुजू झाले होते. या वेळी त्यांच्या लग्नाचे बोलणे झाले होते आणि त्यांचा विवाह दिवाळीनंतर करण्याचे ठरले होते. पण, आज त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करत असलेल्या संदीप यांची सैन्यदलात जाण्याची लहानपणापासून इच्छा होती. 2012 मध्ये ते सैन्यदलात भरती झाले होते. यापूर्वी ते बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यानंतर त्याची बदली 22 मराठा बटालियनमध्ये झाली होती. डेहराडूनहून नुकतीच त्यांची उरी येथील लष्करी तळावर बदली झाली होती. संदीपचे कुटुंब शेतात राहत असल्याने त्यांना ही माहिती मिळण्यास उशीर झाला.

माण तालुक्‍यावर शोककळा
लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे हुतात्मा झाल्याची माहिती कळताच माण तालुक्‍यावर शोककळा पसरली. हुतात्मा चंद्रकांत यांचे अन्य दोन भाऊ मंज्या बापू व केशव हे सुद्धा लष्करातच आहेत. गावालगतच्या शेतात त्यांची स्वतंत्र वस्ती असून तिथे पत्नी व दोन मुलांसह कुटुंब राहते. माण तालुक्‍यातील अधिकारी व पदाधिकारी गावात पोहोचले आहेत. पार्थिव पुण्याहून तालुक्‍यात आणले जाणार आहे.चंद्रकांत गलांडे त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गलांडे यांचे दोन्ही भाऊही लष्करात आहेत. चंद्रकांत गलांडे हे माण तालुक्‍यातील तेरावे हुतात्मा जवान आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com