Vidhansabha 2019 : कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'ला प्रत्येकी 125 जागा, आघाडीत मनसे नाही

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे.

‘‘विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी सव्वाशे जागा आणि मित्रपक्षांना ३८ जागा असे सूत्र ठरले असून आघाडीमध्ये पाच ते दहा जागांमध्ये अदलाबदल होईल,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे जाहीर केले. तसेच मनसेला आघाडीला स्थान नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी पवार नाशिकमध्ये आले आहेत. राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शेतकरी कामगार पक्ष, प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा रिपब्लिकन पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर डावे यांचा समावेश असेल. पंतप्रधानांची नाशिक भेट झाल्यावर आचारसंहिता जाहीर होईल आणि दिवाळीच्या आठवडाभर अगोदर मतदान होईल, अशी शक्‍यता दिसते. या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’तर्फे नवीन चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न राहील. मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात यांची मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मी स्वतः भुजबळांसह इतर ज्येष्ठ नेत्यांना चर्चेसाठी मुंबईत थांबायला सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन बोलावे
मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन बोलले पाहिजे, असे सांगत पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील दिला. ते म्हणाले, की पाकिस्तानमधील अनुभवाबद्दल विचारल्यावर भारतीय क्रिकेट संघासमवेत पाकिस्तानमध्ये गेलो होतो याबद्दल माहिती दिली. भारतीय क्रिकेटपटूंनी चांगल्या धावा केल्यावर पाकिस्तानचे प्रेक्षक स्वागत करत होते. मात्र सत्ता आणि अधिकारासाठी पाकिस्तानमधील सत्ताधारी व लष्करप्रमुख भारतविरोधी भूमिका स्वीकारतात. खुसपट काढण्याचा प्रयत्न करतात. स्वार्थासाठी पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्करप्रमुख वागतात, हे माझे म्हणणे स्तुतीसारखे वाटत असल्यास त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही.

पवार म्हणाले...
- पक्ष भरतीसाठी अर्थ आणि गृह मंत्रालयाच्या आयुधांचा वापर
- उदयनराजेंना समज यायला वेळ लागला
- राज ठाकरे यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा अशी भूमिका मांडली होती. पण ती आम्हाला मान्य नाही. जनतेपुढे जायला हवे
- उद्धव ठाकरे यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला आहे म्हणजेच, निवडणूक फार जवळ आली आहे असे म्हणावे लागेल
- पक्षांतर केलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यापूर्वी सहकाऱ्यांसमवेत चर्चा करून निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com