मुंबई - लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत कमालीचा "गृहसंघर्ष' सुरू होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या यासाठीची महत्त्वाची बैठक पक्षाच्या नेत्यांनी बोलावली आहे.
विधानसभेत सध्या कॉंग्रेस 42, तर राष्ट्रवादी 40 असे संख्याबळ आहे. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर व जयकुमार गोरे यांनी कॉंग्रेसला रामराम करीत भाजपप्रवेशाची तयारी सुरू केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कॉंग्रेसचे हे बंडखोर आमदार भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील, असे चित्र आहे. त्यामुळे विधानसभेतील राष्ट्रवादीचे संख्याबळ कॉंग्रेसपेक्षा अधिक राहणार असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे. यासाठीची रणनीती आखण्यासाठी उद्या (ता. 28) विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे.
दरम्यान, कॉंग्रेससोबत आघाडीत राहून "राष्ट्रवादी'ला फटका बसत असल्याचा सूर काही नेत्यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करावी काय? यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत राज्यातला दलित व मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्याचे लोकसभा निवडणूक निकालाने सिद्ध केले आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजनचे इम्तियाज जलिल यांनी विजय मिळविल्यानंतर दलित-मुस्लिम हे समीकरण चालू शकते, यावर मुस्लिम समाजाचा विश्वास बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा "वंचित बहुजन'मधून आपण आपले उमेदवार निवडून आणू शकतो, हा आत्मविश्वास मुस्लिम समाजाला आल्याचे मानले जाते.
त्यामुळे कॉंग्रेससोबत जाण्याऐवजी "वंचित'सोबत आघाडी करावी व कॉंग्रेस एकाकी पडत असली, तरी त्याची चिंता करू नये, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे.
किमान 12 जण फुटणार?
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा भाजपप्रवेशाचा निर्णय पक्का झाल्यानंतर त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे सध्या तीन आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यामध्ये आणखी कॉंग्रेस आमदार जोडले जातील व किमान बारा कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा विखे-पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे.
|