राळेगणसिद्धी - निवडणुकीनंतर सर्व मते एकत्र करूनच त्याची मोजणी करावी. मतांच्या अशा एकत्रीकरणासाठी यंत्र वापरावे, अशा मागणीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पाठविल्याचे आज सांगण्यात आले.
हजारे यांनी पत्रात म्हटले आहे, की घटनेनुसार मतदान गुप्त राहिले पाहिजे. सध्या गावनिहाय किंवा प्रभागनिहाय मतमोजणी करण्यात येते. त्यामुळे कोठे किती मते मिळाली, हे उमेदवारास कळते. त्याचा विकासकामे करण्यावर परिणाम होतो आणि या पद्धतीत मतदानाची गोपनीयताही भंग पावते. हे टाळण्यासाठी मतमोजणीपूर्वी सर्व मते एकत्र करण्यासाठी एका यंत्राचा वापर करावा, असेही हजारे यांनी म्हटले आहे. त्यांनी हीच मागणी निवडणूक आयोगाकडे दोन वेळा केली होती. "आम्ही याबाबत सरकारकडे परवानगी मागत आहोत,' असे आयोगाने कळविल्याचेही पत्रात म्हटले आहे.
|