इंदापूरला आवर्तन सुरू

इंदापूरला आवर्तन सुरू

शेटफळगढे - सध्या टंचाईशी झगडणाऱ्या इंदापूर तालुक्‍यासाठी शुक्रवारपासून (ता. ७) शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी तालुक्‍याच्या सुरवातीच्या भागात म्हणजे शेटफळगढे भागात नुकतेच पोचले. याचा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

सध्या खडकवासला प्रकल्पात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा आहे. मात्र, खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील इंदापूर तालुक्‍यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे उसासह, चारा पिकांना नियमित पाणी द्यावे लागत होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरी व कूपनलिका यांनाही पिकांना देण्याएवढे सध्या पाणी नाही. त्यामुळे इंदापुरातील शेती सिंचनासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने होत होती. 

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्यासाठी बारामती तालुक्‍यातील दुष्काळी भागातील जानाई शिरसाई योजनेशी संबंधित असलेल्या तलावात पाणी सोडण्यात आले होते. मात्र, इंदापूर तालुक्‍यातही दुष्काळी स्थिती असल्याने तत्काळ खडकवासला धरणातून आवर्तन सोडावे, अशी मागणी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मुंबईत ४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्‍याच्या सिंचनासाठी आवर्तन सोडले आहे. 

शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा
हे आवर्तन सध्या शेटफळगढे भागात सुरू आहे. या आवर्तनामुळे पावसाअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असलेली पिके वाचण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे सध्या तरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com