
Weather Update : राज्यात उष्णतेची लाट; उन्हाच्या झळा वाढणार
राज्यात काल कमाल तापमानाची नोंद झाली तर आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सियसच्या वर पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.(Weather Update heat wave warning maharashtra Vidarbha)
आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान 40 अंशांच्या वर आणि सरासरीच्या तुलनेत तापमान 4.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढले असल्यास उष्णतेची लाट आली असं समजले जाते.
राज्यात गुरुवारी जळगावात 44 अंशांच्या वर तापमान होतं. तर अकोल्यात 43.5 आणि धुळ्यात 42.0 अंश सेल्सियस तापमान नोंद झालं. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या वर होता.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा 42 ते 45 अंश सेल्सियसवर तर पुण्यात 40 आणि मुंबईत 36 ते 38 अंश सेल्सियसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रात आज उष्ण कोरडं हवामान राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कमाल तापमानात वाढ होईल असंही म्हटलं आहे.