ठाकरे-मुनगंटीवार भेटीवर विखेंची टीका
मुंबई - 'जीएसटी'संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील, तर सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन कशासाठी बोलावले? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केला.
"जीएसटी'संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरे यांच्याकडे फेऱ्या मारत असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, सरकारला "जीएसटी'बाबत घटकपक्षांशी चर्चा करायची असेल, तर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक घ्यायला हवी; परंतु त्याऐवजी सरकार उद्धव ठाकरे यांच्या रूपात घटनाबाह्य व्यक्तीच्या दारात उभे झाल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांना सरकारच्या निर्णयप्रक्रियेत काडीचाही अधिकार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिकेचे पर्यायाने खंडणीखोर व मांडवलीबहाद्दर शिवसेनेचे आर्थिक हित जपण्यासाठी "जीएसटी'त हस्तक्षेप करायला उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ आहे;पण शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारशी साधी चर्चा करायलाही त्यांना सवड नाही, यातून शिवसेनेचे "ध्येय' आणि "धोरणे' स्पष्ट होतात, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.
|