मुंबई - वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून, वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची तर पाळीव प्राणी गाय, बैल, म्हैस यासारख्या पशूंची वन्यजीव प्राण्यांनी शिकार केली तर प्रत्येकी 60 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
अवनी वाघीण संदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कारवाई न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली. वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. गाय, बैल, म्हैस यांचा बळी गेला तर पूर्वी 40 हजार रुपये मदत मिळत होती. ती आता वाढवून 60 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्त्वाचा असून दोघांचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत, असे मुनगंटीवार म्हणाले.
देशभरातील वनमंत्र्यांची बैठक
देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून, त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना, शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.
|