परवाना नसतानाही उसाचे गाळप

Sugar-Factory
Sugar-Factory

राज्यातील 13 कारखान्यांना आयुक्‍तांची नोटीस
सोलापूर - यंदाचा साखर गाळप हंगाम 20 ऑक्‍टोबरपासून सुरू झाला आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना यंदा साखर आयुक्‍तांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गाळप परवानाच दिला नाही. मात्र, परवान्याची वाट न पाहता उसाचे थेट गाळप करणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्‍तांनी कारवाईचा बडगा उगारला असून, राज्यातील 13 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

साखरेचे दर घसरले, निर्यातीच्या धोरणाला विलंब लागला यासह अन्य कारणांमुळे कारखानदारांनी मागील गाळप हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. काही कारखान्यांनी उशिराने एफआरपी दिली. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवानाच देण्यात आला नाही. तरीही सोलापूरसह राज्यातील 13 कारखान्यांचे गाळप सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार साखर आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांनी या कारखान्यांना नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना याचिका दाखल करणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

नोटीस दिलेले कारखाने
सोलापूर जिल्ह्यातील मकाई, मातोश्री, संत दामाजी, सिद्धेश्‍वर, जयहिंद व गोकूळ शुगर यांच्यासह अन्य जिल्ह्यांमधील जय श्रीराम शुगर, पूर्णा, भीमाशंकर शुगर, वसंतदादा शुगर, भाऊराव चव्हाण साखर कारखाना, अचनी शुगर, निपाडचा केजीएस शुगर या कारखान्यांना परवाना नसतानाही गाळप घेतल्याप्रकरणी नोटीस बजावल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

राज्याची स्थिती
गाळप परवाना मिळाला - 143 साखर कारखाने
आतापर्यंतचे गाळप - 140.74 लाख मे.टन
साखर उत्पादन - 134 लाख क्‍विंटल
परवाना नसूनही गाळप - 13 कारखाने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com