मुंबई - सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि उपचाराविना गरिबांचा जीव जाऊ नये, यासाठी डॉक्टरांनी तत्काळ संप मागे घ्यावा. रुग्णसेवेपासून कुणालाही वंचित ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.
सदस्य मिलिंद माने यांनी डॉक्टरांच्या संपाबाबत औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, की डॉक्टरांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. राज्य शासनाने हल्लेखोरांवर कारवाई केली आहे. हल्ले रोखण्यासाठी विधिमंडळानेही कायदे केले आहेत. सध्या डॉक्टरांच्या सुरू असलेल्या संपामुळे सर्वाधिक हाल गरीब रुग्णांचे होत आहेत. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत, त्यासाठी राज्यशासन स्वत:हून पुढाकार घेईल, असे आश्वासन डॉक्टरांना देतो. डॉक्टरांवरील हल्ल्याची दखल शासनाने घेतली आहे. मात्र, संप करून डॉक्टरांनी गरीब रुग्णांना सेवाशुश्रूषा नाकारणे योग्य नाही. राज्यशासन पूर्णपणे डॉक्टरांच्या पाठीशी आहे.
डॉक्टरांना संरक्षण देण्याची राज्य शासनाची तयारी असून संपामुळे समाजात चीड निर्माण होत आहे. त्यांच्यामध्ये रुग्णसेवेपासून वंचित ठेवल्याची भावना निर्माण होत आहे, याची दखल डॉक्टरांच्या संघटनांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
|