जगाला युद्ध नको, बुद्ध हवा - मुख्यमंत्री

जगाला युद्ध नको, बुद्ध हवा - मुख्यमंत्री

गेट वे ऑफ इंडियावर विश्‍वशांती परिषदेचे उद्‌घाटन
  मुंबई - तलवारीने कुणीच जग जिंकू शकला नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्‍चित जिंकता येते. तथागत गौतम बुद्धांच्या याच विचारांची आज देशासह साऱ्या जगाला आवश्‍यकता आहे. जगाला युद्ध नको, तर बुद्ध हवा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या विश्‍वशांती परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 26 नोव्हेंबरला हॉटेल ताजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंसेने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच हॉटेल ताजसमोर गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने विश्‍व शांती परिषदेद्वारे आज शांतीचा संदेश दिला जात आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगिकार सर्वांनीच करणे आज पुन्हा काळाची गरज आहे. जपानमधील नागरिकांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा स्वीकार केल्यानंतरच जपानची प्रगती झाली. चीनमधील ड्युनहॉंग बौद्ध लेण्या महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या विचारांचा अंगिकार करून देशाचे संविधान तयार केले. त्यांचे विचार जगाला दिशा देणारे आहेत. ते जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. 21 व्या शतकात डिजिटल चलनाला महत्त्व असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम ऍप आणि भीम आधारद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने मानवंदना दिली आहे. आपले सरकार समतेचे राज्य स्थापित करण्यास कटिबद्ध असून, गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची कास धरूनच यापुढेही काम सुरू ठेवू, असे ते म्हणाले.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे जतन व्हावे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे या वेळी सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, शील, करुणा या विचारांचा स्वीकार केला. समतेवर आधारित संविधान त्याच विचारांवर आधारलेले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रिजीजू यांनी गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश जगाला मार्गदर्शन करणारा असून भारत हाच संदेश जगाला देत आला असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच सर्वांना समानतेने राहणे शक्‍य आहे, असे ते म्हणाले. दिलीप कांबळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी पाठीशी घेऊन अनेकांनी मार्गक्रमण केले असल्याचे सांगून गौतम बुद्धांच्या विचारांची आजही गरज असल्याचे नमूद केले. हाच विचार जगभर पोहचवण्यासाठी ही विश्‍व शांती परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार अरविंद सावंत, अमर साबळे, श्रीलंकेच्या राजदूत सरोजा सिरीसेना, थायलंडचे राजदूत एकापोल पोलपीपट यांनीही आपले विचार व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविकाद्वारे परिषदेचा उद्देश स्पष्ट केला.
 
  या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, आशीष शेलार, डॉ. मिलिंद माने, संजय शिरसाट, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त पीयुष सिंह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे महासंचालक राजेश ढाबरे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com