
Aai Kuthe Kay Karte: लग्न ठरलं आणि अरुंधती-आशुतोषने घेतला खास उखाणा! ऐकून तुम्हीही म्हणाल..
Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणीही पुढे सरकली असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. याच निमित्ताने मालिकेत सध्या त्यांचे लग्नाचे सोहळे आणि त्यात व्यत्यय आणणारे अनिरुद्धचे कारनामे सुरू आहेत.
अशातच आशुतोष आणि अरुंधती यांनी एकमेकांसाठी खास उखाणा घेतल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. आयुष्याच्या अशा टप्प्यावर पुन्हा लग्नाचा निर्णय घेताना दोघांनीही घेतलेला हा उखाणा प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे.
मालिकेतील मेहंदी सोहळ्याचा प्रोमो आता समोर आला होता. ज्यामध्ये अनिरुद्ध घरात वाद घालून यशवर हात उचलतो, यावेळी अरुंधती त्याचा हात रोखते आणि तिच्या हातावरची मेहंदी पुसली जाते. या प्रोमोने प्रेक्षकांना वेड लावलेले असतानाच आणखी एक प्रोमो समोर आला आहे.
ज्यामध्ये अरुंधती आणि आशुतोष एकमेकांसाठी सुंदर उखाणा घेतात. यावेळी अरुंधतीने उखाणा घेत म्हटलं, 'आयुष्याच्या मध्यानीला अनुभवले शांत चांदणे सुखाचे..ध्यानीमनी नसताना लाभले आशुतोष जोडीदार आयुष्याचे.
तर आशुतोष उखाणा घेतो की, 'बसलो होतो माझा मी माझ्याच विचारांच्या गावी.. दूरच्या क्षितिजावर होती मनातली पहाट नवी.. अवचित एका रुक्ष क्षणी मोगऱ्याचा सुगंध दरवळला... अरुंधतीच्या येण्याने मला जगण्याचा अर्थ समजला'. हा उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लवकरच अरुंधती आणि आशुतोष लग्न करणार आहेत. या लग्नाला सर्वांचा पाठिंबा असला तरी अनिरुद्ध आणि त्याची आई कांचन मात्र हे लग्न मोडण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. अरुंधती साठी हा निर्णय घेणं प्रचंड मुश्किल होतं. कारण पहिला संसार २५ वर्षांचा झालेला असताना, मुलांची लग्न, नातवंड असताना लग्न करताना समाज काय म्हणेल असा प्रश्न सर्वांपुढे असतो. पण या सर्व विरोधाला झुगारून अरुंधती लग्नाचा निर्णय घेते. तिच्या या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.