
Anupam Kher: सेटवर खूप नखरे करायचे अनुपम खेर..अमिताभनी एका क्षणात अभिनेत्याची बोलती केली होती बंद..
Anupam Kher: बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर आज आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९८४ साली महेश भट्ट यांच्या 'सारांश' सिनेमातून अनुपम खेर यांनी सिने-जगतात पदार्पण केलं होतं.
अनुपम खेर यांनी आपल्या करिअरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. 'तेजाब','राम लखन','चांदनी','परिंदा' आणि 'चालबाज' सारख्या सिनेमातून आपल्या भूमिकांमुळे प्रसिद्धिस आलेले अनुपम खेर यांनी आपण सेटवर खूप नखरे करायचो असं कबूल केलं होतं. (Anupam Kher BIrthday Amitabh bachchan taught a lesson in chennai while shooting)
अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा ते एक प्रसिद्ध अभिनेते झाले तेव्हा त्यांनी सेटवर अॅटिट्युड दाखवयला सुरुवात केली होती. त्यांनी सांगितलं की एका घटनेनंतर त्यांचं हे सेटवर नखरे दाखवणं क्षणात बदललं होतं.
अनुपम खेर म्हणाले की, अमिताभ बच्चन एक असे कलाकार आहेत ज्यांची नेहमीच्या वागण्यातील कृतीही त्यांच्या कामापेक्षा अधिक बोलून जाते. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अनुपम खेर चेन्नईत एक सिनेमा शूट करणार होते.
अनुपम खेर यांनी सांगितलं की, मी चेन्नईतील एका स्टुडियोत एका सिनेमाचं शूटिंग करत होतो. तेव्हा माझ्या मेकअप रुममध्ये एअर कंडिशन नाही हे माझ्या लक्षात आलं. मी आरडा-ओरड आणि तक्रार करायला सुरुवात केली.
मी म्हटलं,''मला वाटलं होतं चेन्नईत तरी चांगले मेकअप रूम्स असतील. माझ्या मेकअपला त्या माझ्या आरडाओरडीमुळे लेट झाला आणि मी सेटवर उशिरा पोहोचलो. पण माझ्याआधी तिथे अमिताभ बच्चन पोहोचले होते''.
अनुपम खेर म्हणाले, ''मला सेटवर गेल्यावर कळलं की अमिताभ आपला मेकअप करून माझ्याआधी तब्बल १ तास सेटवर हजर राहिले होते. ते एक उबदार चांदर अंगावर ओढून बसले होते कारण सिनेमाच्या सीनमध्ये त्यांचा लूक तसाच होचा''.
''मी त्यांना विचारलं,'तुम्हाला गरम नाही होत आहे?' तेव्हा अमिताभ यांनी उत्तर दिलं की,'जर मी याचा विचार केला तर मला गरम होईल'. त्यांचा म्हणण्याचा उद्देश्य होता की अनेक गोष्टी या आपल्या विचारांवर अवलंबून असतात.आणि आपण कसा विचार करायचा हे आपल्या हातात असतं''.