'..आमच्याही डोळ्यात तुम्ही पाणी आणलं'; भूषणची पोस्ट वाचून नेटकरी भावूक

मालिकेच्या निर्मात्यांना नेटकऱ्यांनी केला सवाल
Bhushan Pradhan
Bhushan PradhanInstagram

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या १५० भागांतच ही मालिका संपतेय. अशा वेळी मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस कसा होता हे सांगताना अभिनेता भूषण प्रधानने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. या मालिकेने भूषणने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मालिका लवकर बंद होण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

भूषण प्रधानची पोस्ट-

'मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.. इतक्या लवकर? अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं! चित्रपट, वेब सीरिज यांचं जरा बरं असतं. अमुक एक दिवसांनी आपल्याला या पात्राची साथ सोडायची आहे हे माहित असतं. मालिकेचं तसं असेलंच असं नाही. शेवटचा दिवस हा आजही असू शकतो किंवा सहा महिन्यांनी किंवा अनेक वर्षांनी. याआधीही याचा अनुभव आल्याने कायमच सतर्क होतो. ‘भूषण, आजचा दिवस राजा म्हणून जगायला मिळतोय तो पूरेपूर जग’ स्वतःला रोज सांगायचो. मग दाढी मिशी चिकटवण्यासाठी चेहऱ्याला लावण्यात येणारा, एरवी नकोसा वाटणारा-झोंबणारा तो ‘बोरकर गम’ही अचानक गार वाटायचा.'

Bhushan Pradhan
TRP यादीत 'ही' मालिका अग्रस्थानी; 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

अनेकांना आवडत असताना मालिका इतक्या लवकर संपतेय याचं वाईट वाटावं की प्रेक्षकांना मालिकेचा कंटाळा येण्याच्या आत मालिका संपतेय याचा आनंद, अशा संमिश्र भावना मनात असताना त्याने पुढे शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला.

त्याने पुढे लिहिलं, 'आपल्या आजूबाजूला काय घडतंय, परिस्थितीमध्ये काय बदल होतायत, येणाऱ्या अफवांमधे तथ्य असू शकते का, त्याची कारणं काय असू शकतात, असे अनेक विचार डोक्यात सुरु होते आणि अशातच अचानक कळले की हा बाजींचाच नाही तर आपला आणि मालिकेचाही शेवटचा दिवस. धक्कादायक असूनही धक्का बसला नाही. खंबीर होतो.. राजांमुळे, राजांसारखा! तयारी नव्हती, ती या भूमिकेस अलविदा म्हणण्याची. काही क्षणात ह्या भूमिकेसाठी शेवटचे अॅक्शन आणि शेवटचे कट ऐकू येणार. तयारी? अजूनही नाही. डोळ्यातून अश्रू वाहणार? नाही.. तू राजांच्या वेषात आहेस.. राजांच्या भूमिकेत आहेस.. आणि राजाला रडण्याची मुभा नाही. अश्रू गाळायचे तर भूषण म्हणून… स्वतःच्या वेषात… स्वतःच्या भूमिकेत. घोडखिंडीतून राजे निघाले, बाजी प्रभूंस म्हणाले, ‘येतो आम्ही’… कट!'

'राजांच्या वेषातच सेटवर जाऊन आलो. कोणीच नव्हते तरीही सगळे होते. सगळ्या पात्रांस आठवून आलो, अलविदा म्हणून आलो. माँसाहेबांची खूप आठवण आली. आज त्या सेटवर नव्हत्या ते बरेच झाले. राजाला रडता येत नाही; पण मुलाने आईसमोर अश्रू रोखायचे ते कसे? मेकअप काढला, कपडे बदलले. घरी आलो… अश्रू न रोखता आईस सांगायचे असे ठरवले. सांगितले… पण अश्रू? नाहीत!! दुसऱ्या दिवशी बाबांस सांगितले… अश्रू? नाहीत!!! शांत बसलो.. विचार केला. ह्याआधी एखाद्या भूमिकेची साथ सोडल्यावर मला रडू यायचं. मग आता का नाही?? उत्तर मिळालं… “साथ सोडलीय कुठे! ज्या विचारांच्या जवळ जाऊ शकलास ते विचार जप! त्या विचारांच्या रूपाने… आहोत आम्ही”!'

भूषणच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या मालिकेविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या. 'राजे तुमच्या नाही पण आमच्या डोळ्यात पाणी आणले तुम्ही. मालिका एवढ्या लवकर संपायला नको होती,' असं एकाने लिहिलं. तर 'मालिका बंद होण्यामागचं कारण काय आहे? इतकी चांगली मालिका कशी काय बंद होऊ शकते? नको त्या फालतू मालिका चालू आहेतच ना,' अशी कमेंट दुसऱ्याने केली. 'इतक्या लवकर शेवट? कधी ही न संपो असं वाटत होतं,' असं एका युजरने लिहिलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com