- राजाराम सूर्यवंशी .
गिरीश कर्नाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त...
आज महान नायक ,ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त गिरीश कर्नाड यांचा ४था स्मृतीदिवस आहे.त्यानिमित्ताने गिरीश कर्नाडांच्या स्मृतींना विशेष अभिवादन..!
--
चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत संवेदनाक्षम व बुध्दीमान व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख आहे,असे चित्रपट अभिनेते,दिग्दर्शक , लेखक, नाटककार , अनेक बहुमोल पुरस्कार प्राप्त असे, आपल्या सर्वांना त्यांच्या कसदार अभिनयाने खिळवून ठेवणारे उत्तम कलाकार श्री गिरीश कर्नाड यांचा जन्म बदलापूर-नेरळ जवळील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी १९ मे १९३८ रोजी झाला होता.
कृष्णाबाई मानकीकर या एक विधवा स्त्री.त्यांचे माहेर माथेरान ! त्या बाॕम्बे मेडिकल सर्विसेसमध्ये परिचारिकेचे प्रशिक्षण घेतांना त्यांची ओळख तेथल्या डाॕ रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली होती.
डाॕ रघुनाथ कर्नाड हे आर्य समाजीयन होते. तसेच ते जातीभेद व स्त्रि-पुरुष विषमतेच्या विरोधी होते. म्हणून त्यांनी विचारसरणीला अनुसरुन विधवा कृष्णाबाईंशी आर्य समाजीयन पध्दतीने ,ब्राह्मण मध्यस्थाविना, रितसर लग्न केले होते.
कृष्णाई व डाॕ रघुनाथ यांना चार अपत्य झाली. गिरीश कर्नाड हे त्यांचे तिसरे अपत्य होते. गिरीश कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले होते. तसेच याच .पुण्यात त्यांच्यावर नाटकांचे संस्कार बालगंधर्व व किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या सहवासात झाले होते.
त्यांचे उच्चशिक्षण आॕक्सफर्ड येथे लिंकन कॉलेजात झाले होते व त्यांनी काही काळ शिकागो विद्रापिठात हंगामी प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. पुण्याहून आॕक्सफर्डला जाण्यापुर्वी गिरीश कर्नाड हे कर्नाटक आर्ट महाविद्यालयातून गणित व संख्याशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीत बी. ए. उत्तीर्ण झाले होते.
तर, इंग्लंडमध्ये त्यांनी तत्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्रांमध्ये पदवीत्तर शिक्षण पुर्ण केल्यावर १९६२ मध्ये त्यांची आॕक्सफर्ड युनियनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ या कालावधी कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते.
(Girish Karnad death anniversary his education career success award social work personal life movie drama books )
तर १९८८-१९९३या काळात कर्नाटक नाटक अकादमीचे सभापती होते. कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड व हिंदी सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. व त्यात अभिनयही केला होता. त्यांनी एक डझनपेक्षा अधिक नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले होते.
त्यांच्या या नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल कर्नाटक विद्यापिठाने डाॕक्टरेट व युनिव्हर्सिटी आॕफ सदर्न कॕलिफोर्नियाने त्यांना डी. लिट. पदवीने सन्मानित केले होते.
त्याशिवाय कर्नाड यांना खालील प्रकारचे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये १) कालिदास सन्मान पुरस्कार,२) तन्वीर सन्मान पुरस्कार.२०१२, ३) " नागमंडल"साठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कारा.[१९९२], ४) पद्मभुषण [१९९२], ५) पद्मश्री [१९७४], ६) " भूमिका " चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार, ७) सर्वोत्कृष्ट चित्रपट " कनक पुरःदर"साठी सुवर्ण कमल पुरस्कार[१९८९]
८) "वंशवृक्ष" या चित्रपटाच्या उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार [१९७२], ९) " संस्कार" या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पूरस्कार [१९७०], १०)संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार [१९७२], ११) साहित्य अकादमी पुरस्कार [ १९९४ ], १२) होमी भाभा फेलोशिप [ १९७०-७२ ], १३) ज्ञानपीठ पुरस्कार [ १०९८ ], १४) राजोत्सव पुरस्कार.
गिरीश कर्नाड यांनी ' आडाडता आयुष्य ' (खेळता खेळता आयुष्य ) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे 'घडले कसे' या नावाने मराठी भाषांतर राजहंस प्रकाशनाने छापून प्रसिध्द केले होते. कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी विशेष प्रसिध्द होते. त्यांच्या खालील सर्व नाटकांची मराठी इंग्रजी व भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.
१) अग्नी मत्तू मळे (मराठु अनुवाद-अग्नी आणि पाऊस), २) काटेसावरी, ३)टिपू सुलतानचे स्वप्न , ४)तलेदंड ( हे नाटक लग्न लावणारा ब्राह्मण पोरोहित व मयताचे संस्कार करणारा ब्राह्मण पुरोहित यांच्यातील वैचारिक संघर्षावर आधारित होते ),५) तुघलक, ६) नागमंडल, ७) बलि, ८) भंगलेले बिंब पुष्पसाज, ९)ययाति, १०) हयवदन. गिरीश कर्नाड यांची ही सर्व नाटके कानडी भाषेत लिहिलेली होती व त्या सर्वांचे मराठी भाषांतरे विविध मराठी लेखकांनी केली होती.
" हयवदन " हे नाटक गिरीश कर्नाडांनी १९७२मध्ये लिहिले होते.हे नाटक जर्मनीतील थाॕमस मान यांनी लिहिलेल्या " नावेल ट्रांसपोज़ड हेड्स " या नाटकावर आधारित होते. " हयवदन " म्हणजे घोड्याचं डोकं व मानवाचे शरीर असणारा प्राणी. मानवी जीवनातील अंर्तविरोधावर भाष्य करणारे हे प्रभावी नाटक होते. मानवी जीवनातील अपुर्णता , ताण-तणाव यावर नाटक अधारित होते.
विशेष म्हणजे "हयवदन " या नाटकाने भारतीय जातिव्यवस्थेतील पुरुषसत्ताक समाजधारणा व स्त्रिसत्तावादी मातृसत्ताक समाजधारणा यावर स्त्रीवादी नेणिवेतून एक नविन मिश्र परंतु सृजनशील तडजोडावादी व्यवस्था जन्माला घालून आजच्या विषम व पृथकवादी कप्पेबंद समाजव्यवस्थेवर एक सामाईक उपाय दाखविला होता ,जो वैचारिदृष्ट्या आजही अभिनव आहे. या विषयावर आज पन्नास वर्षानंतरही पुरेसे मंथन झालेले नाही.
सत्यशोधक शरद पाटलांनी " हयवदनवर " केलेली समिक्षा आजही वाचनिय व गिरीश कर्नाडांची वैचारिक प्रतिभाझेप दाखवणारी आहे.
गिरीश कर्नाडांनी नव्वदीच्या दशकात 'कन्नड सिनेमातील जातिसंघर्ष' हा एक पेपर सादर केला होता, या पेपरने त्याकाळी माझ्यासारख्या अनेक लेखक व विचारवंतांना भारतीय जातीय वास्तवाच्या दशाननी परिणामांवर विचार करायला प्रवृत्त केले होते.
त्या पेपरचा व अर्थात गिरीश कर्नाडांचा विचारांचा प्रभाव आजही आमच्यासारख्या अनोख्या सामाजिक लिखाण करणाऱ्यांवर कायम आहे. व कायम राहील.
गिरीश कर्नाडांनी आपल्या प्रतिभेने भारतीय सिनेमा व नाट्यसृष्टीला जवळजवळ पाउण शतक भारावून ठेवले होते व तीला संपन्न केले होते. भारतीय जातिव्यवस्था हा त्यांचा चिंतनाचा विषय होता व जातिव्यवस्थाअंत हा त्यांचा उद्देश होता.
कारण या जातिव्यवस्थेत समग्र स्त्रीजातीची शोषणाची बीजे व कष्टकऱ्यांच्या दमणाचे भाले रुतले आहेत ,हे त्यांनी जाणले होते व या बीजं आणि भाल्यांना कसं उपटून फेकता येईल आणि मानवी जीवनातील 'अपुर्णता' 'पुर्णते'त कशी बदलता या अखंड ध्यासाने त्यांनी सातत्याने लेखन व दिग्दर्शन केले होते.जे आज मैलाचा दगड शाबीत झाले आहे. अशा या अवलिया माणसाला ,ज्याला कायम नाविन्याचा ध्यास होता , त्यांना, त्यांच्या लेखणीला व कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.