मुंबई - सोनी वाहिनीवरील महाभारत या मालिकेतील सर्व कलाकार कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले होते. अपवाद होता तो ‘भीष्म पितामह’ मुकेश खन्ना यांचा. या कार्यक्रमाला इतर सर्व कलाकार आले असताना आपण गैरहजर का होता, असा प्रश्न सोशल माध्यमांतून त्यांना विचारला गेला. यावर त्यांनी आपल्या ट्वीट्समधून जे उत्तर दिले त्यामुळे नव्या‘ महाभारताला' सुरुवात झाली. यावर सोशल मीडियातून कपिल शो वरही उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. त्यावेळेपासून या प्रकरणावर काही व्यक्त न झालेल्या कपिलने मुकेश शर्मा यांना उत्तर दिलं आहे.
कपिलच्या एका खास शो मध्ये महाभारत या मालिकेचे ५ कलाकार या मालिकेत सहभागी झाले होते.या कार्यक्रमाला इतर सर्व कलाकार आले असताना मुकेश खन्ना गैरहजर होते. यावर त्यांना त्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न सोशल माध्यमांतून विचारला गेला होता. या मालिकेत ‘भीष्म पितामह’ म्हणून मुकेश खन्ना तर युधिष्ठिरच्या भुमिकेत गजेंद्र चौहान यांनी काम केले आहे. कपिलच्या कार्यक्रमामध्ये नीतीश भारद्वाज (श्रीकृष्ण), गजेंद्र चौहान (युधिष्ठिर), फिरोज़ खान (अर्जुन), पुनीत इस्सर ( दुर्योधन), गूफी पटेल (शकुनि) सहभागी झाले होते. सोनी टीव्हीवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणारा ‘द कपिल शर्मा’ त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिध्द आहे.
मुकेश खन्ना यांनी त्या शो मध्ये न जाण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, ‘ भीष्म पितामह’ यांच्याशिवाय महाभारत अपूर्ण आहे. मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते असे म्हणणे चूक आहे. वास्तविक मीच त्या कार्यक्रमाला जायला नकार दिला होता. मला हे मान्य आहे की, कपिल शो हा भलताच लोकप्रिय आहे मात्र मला हा कार्यक्रम बकवास वाटतो. त्याच्या इतका वाईट शो दुसरा नाही. अश्लील विनोदांनी भरलेला असा हा कार्यक्रम आहे ज्यात पुरुष स्त्रियांचे कपडे घालून नको ते अंगविक्षेप करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आणि विशेष म्हणजे यावर प्रेक्षक पोट धरुन हसत सुटतात.
यावर आता कपिलने मुकेश खन्ना यांना उत्तर दिले आहे. तो म्हणतो, प्रेक्षकांना दोन घटका हसता यावे यासाठी माझी टीम खूप प्रयत्न करत असते. विशेषत; या लॉकडाऊनच्या काळात आम्हाला विशेष काळजी घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करावे लागले. त्यांच्या चेह-यावर हसू आणणे ही खरे आव्हानात्मक असते. प्रत्येकानं आपआपला आनंद शोधण्याचे काम करायचं असतं. ज्यात आपल्याला आवड नाही त्यात वेळ घालवणे चूकीचे आहे. मला तरी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. भविष्य़ात येणा-या चांगल्या संधीसाठी मला तसे करणे महत्वाचे आहे. म्हणून मी कुणाला उत्तर देण्यापेक्षा काम करण्यावर जास्त भर देत असल्याचे कपिलने म्हटले आहे.
मुकेश खन्ना यांच्या टीकेला उत्तर देताना चौहान म्हणाले, खन्ना यांना आता द्राक्षे आंबट लागत आहेत. कारण त्यांनी ती द्राक्षे खाल्ली नाहीत. जे करोडो लोक कपिलचा शो पाहत आहेत त्या शो ला खन्ना वाह्यात म्हणत आहेत. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खन्ना अशाप्रकारचे प्रत्युत्तर दिले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.