
Kushal Badrike: पण समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर?.. प्रेमाविषयी कुशल बद्रिके स्पष्टच बोलला..
Kushal Badrike: कुशल बद्रिके म्हणजे 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडीच्या मंचावरचा एक हिरा... अत्यंत साधा, सरळ आणि निरागस नट.. गेली अनेक वर्ष तो विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचे निखळ मनोरंजन करत आहे.
'चला हवा येऊ द्या' च नाही तर कुशलने अनेक सिनेमातूनही आपली अभिनयाची चणूक दाखवली. 'एक होता काऊ','पांडू' या सिनेमांतून तो मध्यवर्ती भूमिकेत झळकला तर लवकरच तो रावरंभा या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे.
आपल्या अचूक क़ॉमेडी टायमिंगमुळे घराघरात प्रसिद्ध झालेल्या कुशल हल्ली सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय पाहायला मिळतो आहे. नुकतीच कुशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. प्रेमा विषयी परखड भाष्य करणारी त्याची ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे.
(kushal badrike shared gaur gopal das video and talks about love in chala hawa yeu dya show)
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. नुकतंच गौर गोपाल दास हे या कार्यक्रमात आले होते. या शोमध्ये त्यांनी मिश्किल भाष्य करत अनेक उपदेश केले. त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातीलच प्रेमा विषयी भाष्य करणारा एक व्हिडीओ कुशल बद्रिकेने शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये गौर गोपाल दास म्हणतात, ''कधी कधी मैत्री आणि नात्यांमध्ये आपण लोकांच्या इतक्या आहारी जातो, की आपलं अस्तित्वच विसरुन जातो. मग ते आपल्याला रिमोट कंट्रोल करतात.
'ते म्हणाले आपण चांगले दिसतोय, तर आपल्याला आनंद होतो. त्यांनी जर अपमान केला, तर आपल्याला फार वाईट वाटतं. मग आपण आपल्या भावनांचा रिमोट त्यांच्या हातात देतो.
कोणाच्या आहारी जाणं म्हणजे स्वत:ला विसरुन जाणं. स्वत:ची बुद्धी सोडून देणं.'
'पण मला सुखी करायचं काम तुमचं आहे. मला दुखी करायचं काम तुमचं नाही, पण तुम्ही करतच आहात. लोक नेहमी आपल्या भावनांशी फार खेळ खेळत असतात. म्हणून आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात घेणं फार गरजेचं आहे.'
पुढे ते म्हणतात, 'जेव्हा प्रेम होतं, तेव्हा माणूस मागे पुढे काहीच पाहत नाही. प्रेमात कोणीही लॉजिक वापरत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, प्रेम आंधळं असतं आणि लग्न तुमचे डोळे उघडतं. एकदा डोळे उघडल्यावर आपण काय केलंय ते कळतं. अचानक वस्तूस्थिती समोर येते.'
हाच व्हिडिओ शेयर करत कुशल ने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, ''आपण माणसांवर प्रेम करतो, आपल्याला माणसांची सवय होते, पण समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर ? माझ्या आयुष्यातल्या 90% लोकांचा हा प्रॉब्लम आहे . आणि मी सुद्धा त्या 90% लोकांमध्ये येतो.'' कुशलच्या या पोस्टने आता चर्चेला उधाण आलं आहे.