
Subodh Bhave: वयाने लहान असलेल्या मुलीसोबत रोमॅंटिक.. ट्रोलिंगवर सुबोध भावेचं सणसणीत उत्तर..
Subodh Bhave: अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांचा 'फुलराणी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. गेली काही दिवस या चित्रपटाची बरीच चर्चा होती. कारण एका अजरामर नाट्य कृतीतून साकारला गेलेला हा चित्रपट आहे. जेवढे या चित्रपटाचे कौतुक होत आहे, तेवढच सुबोधला ट्रोल केलं जात आहे.
या चित्रपटामध्ये कथानका नुसार सुबोधची नायिका खूपच तरुण दाखवण्यात आली आहे. प्रियदर्शिनी आणि सुबोधच्या वयात बरेच अंतर असल्याने तिच्यासोबत रोमॅंटिक सीन करताना दिसला आहे. या आधीही झी मराठी वरील 'तुला पाहते रे' मालिकेत सुबोध गायत्री दातार या तरुण अभिनेत्री सोबत दिसला होता. त्यामुळे बापाच्या वयाचा असून तरुण मुलींसोबत काम करतोस अशी जोरदार टीका ट्रॉलरकडून झाली. यावर सुबोधने आता सडेतोड उत्तर दिले आहे.
(subodh bhave answered to trollers who said working romantic scene with younger actress priyadarshini indalkar and tula pahate re serial gayatri datar)
सुबोध भावेने नुकतच एका मुलाखतीत वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम करण्यावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल विचारण्यात उत्तर दिले. त्यावर सुबोध म्हणाला, 'माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम करण्यावरुन अनेकदा मला ट्रोल केलं जातं. चित्रपटासाठी कास्टिंगही मी करतो, माझ्याबरोबर काम कोणी करायचं हे देखील मी ठरवतो, पात्रही मीच लिहितो, असे त्यांना वाटते. त्यामुळे मला त्यांना सांगायचं की बाळांनो पात्र काय आहे, यावरुन हे सर्व ठरत असतं.'
'तुला पाहते रे' या मालिकेत वयस्कर पात्र असलेला माणूस आणि तरुण मुलगी ही त्या गोष्टीची गरज होती. या चित्रपटात ‘फुलराणी’ला शिकवणारा व्यक्ती हा तिच्या वयाचा नाही. जर तिच्या वयाचा व्यक्ती हवा असता तर त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी घेतलं असतं.'
'जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती शिकवते तेव्हा ती व्यक्ती समजुतदार, अनुभवी असावी लागते. हे सर्व तुमच्या चेहऱ्यावर दिसावं लागतं, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला काही तरी सांगू शकता. जर बावीशीचा मुलगा तुम्हाला शिकवत असेल तर ते कसं वाटेल? तुम्हाला तसा अनुभव तर असायला हवा,' असे सुबोध या मुलाखतीत म्हणाला.
'मला वयाने लहान असलेल्या मुलींबरोबर काम करायला काहीही अडचण नाही. दिग्दर्शकांनाही काही अडचण नाही. ‘तुला पाहते रे’मुळे मला सवय लागली. पण अडचण लोकांना आहे. ही त्या गोष्टीची गरज आहे. पण मीही या सर्व झोनमधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. काही वेगळे पात्र मिळतात का, याचाही मी शोध घेत आहे,' असेही त्याने सांगितले.
पुढे तो म्हणाला, 'हा चित्रपट माझ्याकडे फार आधी आला होता. सलमान खान, आमिर खान या सर्व कलाकारांनी काहीही केलं तुम्हाला चालतं, पण मराठी कलाकारांनी काही करायचं म्हटलं तर तुमच्या पोटात दुखायला सुरुवात होते. ही समस्या आपल्याकडच्या बऱ्याचशा लोकांमध्ये आहे,' असे परखड भाष्य त्याने केले.