औरंगाबाद महापालिकेची हद्द वाळूज-पंढरपूरपर्यंत वाढणार! प्रशासकीय प्रस्ताव तयार

Aurangabad Latest News
Aurangabad Latest News

औरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला होता. पण अद्याप या भागात नागरी सुविधा पोचलेल्या नसताना आता महापालिकेची हद्द वाळूज-पंढरपूरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. प्रस्तावावर शेवटचा हात फिरवल्यानंतर पुढील आठवड्यात तो शासनाला सादर केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे.

त्यासोबतच गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची हद्दवाढ करण्यासाठीच्या चर्चा सुरू आहे. वाळूज एमआयडीसीसह महापालिका करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता त्याला मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातारा-देवळाई भाग पाच वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर आता पुन्हा महापालिकेची हद्दवाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, महापालिकेची हद्दवाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तयार आहे.

काही महिन्यांपूर्वी वाळूज-पंढरपूर हा भाग महापालिकेच्या क्षेत्रात घेण्यात यावा यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यावेळी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी वाळूज-पंढरपूरपर्यंत महापालिकेची हद्द वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव नगररचना विभागाकडून तयार केला जात आहे. वाळूज परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात टोलेजंग इमारती, रो-हाउसेस उभे राहत आहेत. या परिसराला सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने हा परिसर हद्दीत घेण्याची तयारी सुरू केली आहे.


असा आहे प्रस्ताव
या प्रस्तावात गोलवाडी, तिसगाव, पंढरपूर, वाळूज, वाळूज एमआयडीसी, वाळूज महानगर, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी तसेच पिसादेवी, गोपाळपूर हा परिसर औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट करण्याचे नमूद करण्यात आले आहे. सिडको झालर क्षेत्रात असलेल्या गावांचा देखील विचार केला जात आहे. सध्या प्रस्तावावर अंतिम हात फिरवला जात असून, तो येत्या दोन दिवसांत अंतिम होईल. त्यानंतर तो प्रशासकांना सादर केला जाईल. प्रशासकांच्या स्वाक्षरीनंतर तो शासनाला पाठवण्यात येणार आहे. दोन आठवड्यांत महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

यापूर्वी झाली होती दोनवेळा हद्दवाढ
औरंगाबाद महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. स्थापनेच्या वेळी महापालिकेच्या क्षेत्रात १८ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर २०१६ मध्ये पुन्हा महापालिकेची हद्दवाढ करण्यात आली आणि सातारा-देवळाई हा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. मात्र, अद्याप या भागात महापालिकेने नागरी सुविधा पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिका स्थापनेच्यावेळी समाविष्ट करण्यात आलेल्या १८ खेड्यांचा देखील अद्याप परिपूर्ण विकास होऊ शकला नाही.

हद्दवाढीची काय आहेत कारणे?
वाळूज एमआयडीसी भागात सध्या सात ग्रामपंचायती आहेत. वाळूज, पंढरपूर, वळदगाव, वडगाव-बजाजनगर, जोगेश्‍वरी, रांजणगाव, घाणेगाव, तीसगावचा समावेश आहे. या भागात सुमारे पाच लाख लोकसंख्या आहे. यातील काही ग्रामपंचायती महापालिका हद्दीत असल्यास या भागाचा विकास होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com