औरंगाबादकरांनो, सोमवारपर्यंत शिस्त पाळा, अन्यथा कर्फ्यु अटळ

सुनील केंद्रेकर
सुनील केंद्रेकर

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप जनतेतून करण्यात आल्यानंतर एकमेकांच्या समन्वयातून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सातत्याने प्रयत्नशील असल्याचा दावा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी येथे केला. सोमवारी (ता. सहा) लोकप्रतिनिधींसोबत बैठक होईल. शिस्त पाळण्यास सोमवारपर्यंतची मुद्दत आहे. तोपर्यंत परिस्थीती नियंत्रणात आली तर ठिक आहे. अन्यथा त्यानंतर लावण्यात येणारा कर्फ्यु हा साधारण नसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यात महसूल, मनपा, पोलिस तसेच आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात शुक्रवारी (ता.तीन) पत्रकार परिषदेत तब्बल तीन तास ‘आम्ही हे केले आम्ही ते केले’, असे दावे करीत माहिती देण्यात आली. 

श्री. केंद्रेकर म्हणाले, की मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांबरोबरच औरंगाबाद शहर, वाळूज परिसरावर माझे बारकाईने लक्ष असून, सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्य करत आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुरवातीलाच प्रशासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, अधिकारी, कर्मचारी यांची कामगिरी, विविध विभागांतील असलेला समन्वय आदी बाबी सांगितल्या. 

महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनीदेखील शहरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधा, नागरिकांचा सहभाग याबाबत माहिती दिली; तसेच महापालिकेत २४ तास सुरू करण्यात आलेली वॉररूम, शहरात मोठ्याप्रमाणात करण्यात येत असलेल्या चाचण्यांबाबत माहिती दिली. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे; परंतु ती नियंत्रणाबाहेर गेल्यास ‘कर्फ्यू’ लावण्याशिवाय पर्याय ठरणार नसल्याचेही श्री. पांडेय म्हणाले. 

पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वत:हून पुढाकार घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अपर विभागीय आयुक्त डॉ.विजयकुमार फड, म्हाडाचे मुख्याधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, औषध वैद्यक शास्त्रविभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य उपस्थित होते. 

आरोग्य यंत्रणा सक्षम : डॉ. येळीकर 
औरंगाबादमध्ये मार्चच्या मध्यात कोरोना दाखल झाला. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य यंत्रणेतील कोविड योद्धे अथक परिश्रमातून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. घाटीमध्ये औषध वैद्यक विभागात २०८ खाटांची तर सुपर स्पेशालिटी इमारतीत २४८ खाटांची सुसज्ज अशा प्रमाणात सर्व सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com