भाजपमध्ये धुसफूस (वाचा सविस्तर)

file photo
file photo

औरंगाबाद : भाजपच्या शहर व जिल्हाध्यक्षाच्या निवडीनंतर पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. शहराध्यक्षपदी म्हाडाचे विभागीय सभापती संजय केणेकर व जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले विजय औताडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या निवडीवरून पक्षात खदखद आहे. निवडीवरून एकीकडे आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, नाराज असलेले माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आणि त्यांचे पदाधिकारी शिवसेनच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपने शहर आणि जिल्ह्याची जबाबदारी देताना जुन्या, नव्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला असला तरी यातून अंतर्गत गटबाजीचे दर्शनदेखील घडले. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याविषयी नाराज असल्याने या निवड कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली. तर गेल्या चार वर्षांपासून पक्षाचे संघटन मजबूत करणारे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनाही संधी मिळणार नसल्याने या कार्यक्रमास गेले नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची वर्णी लावून जालन्यापाठोपाठ औरंगाबादवर देखील आपले वर्चस्व कायम राखले. 

वाचा - शेवटी भाजपचा तिढा सुटला  
 
पुन्हा तोच कित्ता 
शिवसेनेतून भाजपमध्ये आल्यानंतर किशनचंद तनवाणी यांना थेट शहराध्यक्ष करण्यात आले होते. तेव्हा बाहेरून आलेल्यांना मोठी पदे देऊन निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला गेल्याची चर्चा होती. मात्र सत्तांतरानंतर विरोधात गेलेल्या भाजपने स्थानिक पातळीवर आपले सूत्र बदलत जुन्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाध्यक्ष निवडताना पुन्हा राष्ट्रवादीतून आलेल्या विजय औताडे यांना संधी देण्यात आली. औताडे हे रावसाहेब दानवे यांचे पाहुणे असल्यानेच ही संधी देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. 

तनवाणींच्या नाराजीचा भाजपला फटका? 
चार वर्षे शहराध्यक्षपद सांभाळताना शिवसेनेतील निष्ठावंतांना भाजपमध्ये आणत भाजपचे संघटन मजबूत करण्याचे काम श्री. तनवाणी यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या राजकारणात देखील तनवाणी यांनी शिवसेनेवर अंकुश ठेवण्याचे काम केले. आता नाराज असलेले किशनचंद तनवाणी हे शिवसेनेत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली


बागडेंवर दानवेंची कुरघोडी 
जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या आमदार हरिभाऊ बागडे या निवड प्रक्रियापासून दूर राहिले. जिल्हाध्यक्षपदासाठी निष्ठावंतांना टाळून दुसऱ्या पक्षातून आलेल्या विजय औताडे यांना संधी दिल्याने ही नाराजी असल्याचेही बोलले जात आहे. औताडे यांची ही निवड हरिभाऊ बागडे यांच्यावर केलेली कुरघोडी असल्याचेही बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com