
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा एल्गार
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य स्वीकारले जाणार नाही; तसेच प्रात्यक्षिक परीक्षा व बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
औरंगाबाद - बहिष्कार... बहिष्कार... शंभर टक्के बहिष्कार, आधी पगार... तरच माघार... शंभर टक्के अनुदान मिळालेच पाहिजे..., अनुदान आमच्या हक्काचे..., अशा घोषणा देत गुरुवारी (ता.23) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयावर कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटनेतर्फे मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले. प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षा कामकाज व पेपर तपासणीवर बहिष्कार असल्याचे निवेदनही देण्यात आले.
तीन सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील एक हजार 638 विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र घोषित करण्यात आली. शिवाय यापूर्वी 28 फेब्रुवारी 2018 रोजी 146 विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र घोषित केली होती. 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र घोषित विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना एक एप्रिल 2019 पासून सरसकट 20 टक्के अनुदान दिले जाईल व त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनात केली जाईल, असा स्पष्ट उल्लेख होता.
त्यामुळे उपाशीपोटी काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु हिवाळी अधिवेशनात अनुदानाची तरतूद न झाल्याने शिक्षकांचा भ्रमनिरास झाल्याची भावना संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली.
जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा...
100 टक्के निकालाची अट रद्द करावी, एक एप्रिल 2019 पासून 20 टक्के अनुदान वितरित करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी. या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य स्वीकारले जाणार नाही; तसेच प्रात्यक्षिक परीक्षा व बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल
संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. दीपक कुलकर्णी, मनोज पाटील, उपाध्यक्ष प्रा. राहुल कांबळे, राज्य कार्याध्यक्ष प्रा. संतोष वाघ, राज्य सचिव प्रा. अनिल परदेशी अध्यक्ष संघपाल सोनोने, विभागीय सचिव बाबासाहेब नागरगोजे, विभागीय संघटक प्रा. दगडुबा पवार, ज्ञानेश्वर मुंडे, प्रा. संजय देवकर, प्रा. अष्टपाल सिरसाट, बीड जिल्हाध्यक्ष राजेश गीते, परभणी जिल्हाध्यक्ष रविकांत जोजारे, हिंगोली जिल्हाध्यक्ष आशिष इंगळे, जालना जिल्हाध्यक्ष रमेश शेळके, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, सिद्धार्थ कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.