औरंगाबाद : विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून (ता. २४) ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका परीक्षा विभागाला बसला असून, चार दिवसांपासून कामकाज ठप्प आहे. याचा परिणाम एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षेवरही होणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून राज्यातील २४ विद्यापीठांचे कर्मचारी, अधिकारी अजूनही वंचित आहेत. यासंदर्भात राज्यशासन, मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका पार पडल्या. मात्र, कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती व अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे समिती स्थापना केली आहे. गेल्या आठवड्यात ऑनलाइन बैठक होऊन २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे ४५० अधिकारी, कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. यावर कुलगुरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा संपर्क होऊ शकला नाही. परीक्षा संचालक डॉ. योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनीही परीक्षेच्या प्रश्नांवर मी बोलणार नाही, जनसंपर्क अधिकाऱ्यांना विचारा अशी प्रतिक्रिया दिली.
परीक्षेचे काम चार दिवस ठप्प झाले आहे. असाच संप सुरू राहिला तर एक ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर बंद पुकारल्याने कुजबुजीला तोंड फुटले आहे. यावर शिक्षणमंत्र्यांनीच लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संपादन - गणेश पिटेकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.