अग्नी आणि पाऊस : चांगला प्रयत्न 

अग्नी आणि पाऊस : चांगला प्रयत्न 

औरंगाबाद : कामगार कल्याण मंडळाच्या 67 व्या नाट्यस्पर्धेत अग्नी आणि पाऊसचे छावणी कामगार कल्याण केंद्रातर्फे सादरीकरण करण्यात आले. या केंद्राने चांगला प्रयत्न नाट्यस्पर्धेतुन केला आहे. 

अग्नी माटू झाले 

प्रख्यात नाटककार गिरीश कार्नाड (कर्नाड नव्हे) यांनी इ. स. 1994 मध्ये कानडी भाषेत लिहिलेल्या या नाटकाचे मुळ नाव "अग्नी माटू झाले' असे आहे. ते नंतर इंग्रजीत भाषांतरीत झाले. राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्लीने त्याचे हिंदीत रुपांतर केले. अनेक प्रयोग केले. पुढे त्यावर अनेक नामवंत हिंदी सिनेकलावंतांना घेऊन चित्रपटही तयार झाला. अशी ही रंगभूमी आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमात गाजलेली संहिता आहे. 

महाभारताचा आधार 

भारतीय पुराणकथा, मिथककथा यावरच प्रामुख्याने कार्नाडांची अनेक नाटके बेतलेली आहेत. तसेच अग्नी आणि पाऊस नाटकातही महाभारतातील वनपर्व भागातील एका मिथककथेचा आधार घेण्यात आलेला असून तीत अन्यही काही मिथककथा, पुराणकथा यांचे बेमालूम मिश्रण करून कार्नाडांनी ही संहिता लिहिली. अशा पौराणिक वळणाच्या नाटकातून रंगभूषा, वेशभूषा, प्रकशयोजना, नेपथ्य या तांत्रिक संदर्भात भपकेबाजपणा आणण्याची भरपूर संधी असते. संगीत, संवादफेक, अभिनय याहीबाबतीत तो पौराणिक बाज आणावा लागतो, टिकवावा लागतो. प्रेक्षकांनाही काहीतरी छान व वेगळे पाहिल्याचा आनंदही मिळतो. शिवाय मूळ मिथककथेस कार्नाडांसारखा लेखक सद्यकालीन संदर्भ व परिस्थितीशी जोडून घेवून त्यावर भाष्य करतो. त्यामुळे बुद्धीजीवी प्रेक्षकांनाही भरपूर वैचारिक खाद्य मिळते. 

महावितरणने गाजवले नाटक 

प्रस्तूत नाट्यप्रयोगात मुळचे महावितरणचे असणाऱ्या कर्मचारी-कलावंतांनी बऱ्यापैकी जमवून आणलेली आहे. हे नाटक यापूर्वी महावितरणच्या स्पर्धेतून याच संचाने केलेले गाजवलेले आहेच. छावणी कामगार कल्याण केंद्राने त्यांचा प्रस्तूत स्पर्धेत सादर केलेला प्रयोगही सुविहीत झाला असे ढोबळमानाने म्हणता येईल. गिरीश कार्नाडांच्या या संहितेचा मराठी अनुवाद कुणी केलाय, त्याचा उल्लेख सादरकर्त्यांनी केला नाही. परंतु त्यातील माफी, दुफन व असे पुष्कळ शब्द नाटकाचा काळ लक्षात घेता खटकत होते. 

प्रयोग मात्र चांगला 

अशा जातकुळीच्या नाटकांसाठी कलावंतही स्पष्ट व स्वच्छ शब्दोच्चार, व्याकरणशुद्ध भाषा असणारे असणे गरजेचे असते. त्या बाबतीत या संचाचे अनेक कलावंत कमी पडले. परंतु एकूण प्रयोग आणि प्रयत्न चांगला होता. कथानक बहुपदरी आणि गुंतागुंतीचे आहे. यातील अग्नी म्हणजे माणसाची लालसा, सुडभावना तर वर्षा किंवा पाऊस म्हणजे शितलता आणि नवसर्जन. इश्‍वराने माणसाला प्रदान केलेल्या सामर्थ्याचा, शक्तीचा वापर त्याने संयमाने आणि विधायकदृष्टीने करणेच सर्वांसाठी कल्याणकारी असणे हा संदेश या नाटकाला द्यायचा आहे. यंदाच्या प्राथमिक फेरीतील हे नाटक आजवरच्या सादरीकरणात लक्षवेधी ठरले. 


अग्नी आणि पाऊस. 
मूळ लेखक : गिरीश कार्नाड 
दिग्दर्शन : श्रावण कोळनूरकर. 
नेपथ्य : अशोक गवई. 
प्रकाश : प्रेमसिंग राजपूत, 
संगीत : अभिजीत सिकनीस, 
रंगभूषा : विनय घनबहादूर 
वेशभुषा : अभय पंडित, 
कलावंत : रमेश शिंदे, दिनेश लंबे, शिवाजी नरवडे, सुनील बनसोड, अभय एरंडे, अशोक गवई, ज्योती बकाल, उल्का कुलकर्णी, अनिता सातदिवे, किशोर तिळवे, संदेश येवले, इ. सादरकर्ते ः कामगार कल्याण केंद्र छावणी, औरंगाबाद. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com