शेतकरी, गोरगरीब प्रवाशांची भागतेय भूक 

photo
photo

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकावर योग सेवा समितीच्या साधकांतर्फे प्रत्येक रविवारी अन्नदान करण्यात येते, तर रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या "जनता खाना'चा आधार आहे. सिडको बसस्थानकावर मात्र जनसामान्यांची भूक भागावी असा उपक्रम नाही. 
शहरामध्ये जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, श्रमिक आणि सामान्य प्रवासी दररोज आपापल्या कामानिमित्त येत असतात. शहरात आल्यानंतर त्यांना जेवणाचा प्रश्‍न असतो. महागाईच्या काळात हॉटेलमध्ये जेवण करणे परवडणारे नाही म्हणूनच किमान एक दिवस तरी आपण सामान्य माणसांची भूक भागवली पाहिजे, या उदात्त हेतूने योग सेवा समितीच्या साधकांनी अन्नदानाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती डॉ. किरण पतंगे यांनी दिली. 

गरमागरम मसालेभात 

मध्यवर्ती बसस्थानकावर योग सेवा समितीच्या साधकांतर्फे प्रत्येक रविवारी न चुकता सामान्य प्रवाशांसाठी बसस्थानकात गरमागरम मसालेभात आणि त्याच्या जोडीला गोड भात वाटप केला जातो. सामान्य प्रवासी शहरात आल्यानंतर त्याच्या पोटात दोन घास जावेत आणि महागाईच्या जमान्यात पैशांची बचत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम गेल्या दीड वर्षापासून राबवण्यात येत आहे. 

अशी आहे टीम 

बसस्थानकावर अन्नदान करणाऱ्या टीममध्ये प्रमुख डॉ. किरण पतंगे, दिगंबर खराडकर, डी. डी. तुपे, भरत राजपूत, भूपेश शर्मा, मनेष बीसी, शोभा बडे, महेश गरड, श्री. साळवे, श्री. शेजूळ, दादाभाऊ गायकवाड, गणेश चव्हाण, संतोष काळे, काकासाहेब भालकेकर, श्रीराम सुपाने, पुंडलिक वाघ, राजेंद्र गिरी यांचा समावेश आहे. 

रेल्वेस्थानकावर "जनता खाना' 

रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये "जनता खाना' सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रेल्वे कॅन्टीनमध्ये सामान्य प्रवाशांना वीस रुपयांमध्ये सहा पुरी आणि भाजी असा हा मेनू आहे. सामान्य प्रवाशांना "जनता खाना'चा चांगलाच आधार आहे. असे असले तरीही रेल्वे कॅन्टीचालक मात्र बऱ्याच वेळा "जनता खाना' संपला, असे कारण सांगून कमी किंमतीतील "जनता खाना' देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. 

सामाजिक संस्थांचा पुढाकार 

याशिवाय रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासन कुठल्याही संघटनांना अन्नदानासाठी परवानगी देत नाही. मात्र रेल्वेस्थानकाच्या परिसरात काही संस्था महापुरुषांच्या जयंती, पुण्यस्मरण दिनामित्त अन्नदान करतात. राजू शिंदे मित्रमंडळातर्फे संयोजक नितीन दाभाडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या उपासकांसाठी 5 डिसेंबर रोजी अन्नदानाचा उपक्रम राबवतात. याशिवाय प्रवीण नितनवरे यांच्यातर्फेही याचनिमित्ताने अन्नदान केले जाते. त्याचप्रमाणे गुरुनानक जयंतीनिमित्त शीख बांधवांतर्फे सचखंड एक्‍स्प्रेस या गाडीच्या वेळी रेल्वेस्थानकावर अन्नदान केले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com