प्रकाशचा झाला लाईट, सुंदराबाई बनल्या ब्युटीफुल 

Aurangabad news
Aurangabad news

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या इंग्रजीत मागविल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. या नावातील चुकांची दुरुस्ती शुक्रवारपर्यंत (ता.24) न झाल्यास तालुक्‍यातील चौदा हजार 890 शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाकाठी सहा हजार रुपये निधी देण्यासाठी योजनेची निर्मिती केली. महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या मराठी भाषेमध्ये तयार केल्या. या याद्या इंग्रजी भाषेत तयार करण्याचे आदेश आल्यानंतर मात्र सोपा फंडा वापरत मराठी टू इंग्रजी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करण्यात आला.

ही प्रक्रिया करताना संबंधित सॉफ्टवेअर नावाचाही शब्दश: अर्थ घेत असल्यामुळे याद्यांमधील नावे गमतिशीरपणे बदलली गेली. यात प्रकाशचा लाईट झाला, भगवानचा गॉड, सागरचा सी, आकाशचा स्काय, भारतचा इंडिया, दौडचा रेस, वाघचा टायगर, गुलाबचा रोज, समाधानचा सोल्युशन, संतोषचा सॅटिस्फॅक्‍शन, हरीचा ग्रीन झाला, तर सुंदराबाई ब्युटीफूल बनल्या आहेत.

शेतकऱ्यांची तारांबळ

आता याद्यांच्या नावातील दुरुस्ती करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. नावातील चुकांमुळे बॅंक खात्याशी ताळमेळ बसत नाही. कित्येकांना या योजनेतील निधी मिळाला. पण हा निधी आपल्या खात्यात का जमा होत नाही, याचीच चौकशी शेतकरी तहसील प्रशासनाकडे करीत आहेत.

सर्वच गावांमधून कित्येक शेतकऱ्यांच्या नावात असे बदल झाले आहेत. नावातील दुरुस्ती करण्यासाठी आता 24 जानेवारीची मुदत देण्यात आल्यामुळे 14 हजार 890 नावांची दुरुस्ती होणार कशी, हा प्रश्नच आहे. 

केवळ इंग्रजीत याद्या मागविल्या गेल्याने शेतकऱ्यांच्या नावांमध्ये चुकाच झाल्या आहेत. आता दोन दिवसांत नावात दुरुस्ती झालेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तालुक्‍यात या योजनेत 47 हजार 858 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये 32 हजार 945 शेतकरी सद्यःस्थितीला या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. चौदा हजार 890 शेतकरी नावांतील चुकांमुळे, 23 शेतकरी आधारकार्डचा क्रमांक चुकल्यामुळे अपात्र ठरणार आहेत. 

दुरुस्तीसाठी लूट 

शासनाने ग्रामीण भागातील सीएससी केंद्रांवर नावांची दुरुस्ती ऑनलाइन करण्याची सुविधा केली; परंतु या केंद्रांवरही दुरुस्ती होत नसून, ग्रामीण भागातील केंद्रचालक शेतकऱ्यांच्या नावाची दुरुस्ती करण्यासाठी वारेमाप लूट करीत असल्याची ओरड शेतकरी करू लागले आहेत. केवळ वीस रुपये  घेऊन नावात दुरुस्ती करण्याचे आदेश असताना शेतकऱ्यांना यासाठी शंभर ते दीडशे रुपये द्यावे लागत असल्याचा प्रकार सर्रास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com