कायगाव (जि.औरंगाबाद) : कायगाव (ता.गंगापूर) येथे सोमवारी (ता.२१) रात्री झालेल्या अतिवृष्टीचे पाणी शेतातील साचून ग्रामस्थांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे संसारोपयोगी वस्तू, अन्न धान्याची नासाडी होऊन भर पावसाळ्यात बेघर झाल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले आहे. येथील जुने कायगाव ते गंगापूर राज्यमार्ग लगत गेल्या ३५ वर्षांपासून १५ कुटुंबांपेक्षा अधिक कुटुंब शेतवस्ती करून वास्तव्य करित आहेत.
सोमवारी (ता.२१) रात्री अकराच्या दरम्यान अचानक धो-धो करत आलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. काही क्षणातच आजूबाजूच्या शेत पिकांतून पाणी खळखळून वाहू लागले. एकामागून एक पाण्याचा प्रवाह गती धरत ग्रामस्थांच्या घरात शिरला. रात्र असल्याने जीवमुठीत धरून बसलेले ग्रामस्थ दिवस निघताच घराबाहेर पडले. तेव्हा संपूर्ण नागरी वस्तीमधील लोकांच्या घरात पावसाचे पाणीच पाणी झाले होते.
दोन ते तीन फूट उंचीपर्यत शिरलेल्या पाण्यात अनेकांचे संसारोपयोगी वस्तू, भांडीकुंडी, अन्नधान्य भिजले. मात्र विद्युत प्रवाह आणि विचू काटेच्या धोक्यापासून ग्रामस्थ थोडक्यात बचावले. मंगळवारी (ता.२२) दिवसभर अनेकांच्या घरात, ओट्यावर पाणी असल्याने चूल पेटलीच नाही. त्यामुळे अनेक लहान चिमुरडी बाळ वयोवृद्ध व्यक्ती अन्न पाण्यावाचून भुकेने व्याकुळ राहिली.
कोरोनामुळे माणुसकी हरवलेल्या समाजात कोणी शासकीय अधिकारी किंवा गावातील लोकप्रतिनिधीनी आम्ही, पाण्यात वाहिलो की मेलो म्हणून येऊन देखील पाहिले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर काहींनी बोलून दाखवले. अतिवृष्टीच्या पाण्याने तडाख्याने बाधित झालेल्या घरांच्या नुकसानीचा पंचनामा करून महसूल प्रशासनाने नुकसान भरपाई मोबदला द्यावा अशी मागणी मन्सूर शेख, विनोद बिरुटे, सुरेश बिरुटे, अशोक नजन, अनिल बिरुटे, ज्ञानेश्वर विटेकर, कय्युम शेख, संतोष बिरुटे, चंद्रभान विटेकर आदींनी केली आहे.
संपादन - गणेश पिटेकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.