दीड महिन्यात दोनशे मेंढ्यांचा मृत्यू काय आहे कारण 

दीड महिन्यात दोनशे मेंढ्यांचा मृत्यू काय आहे कारण 

करमाड (जि.औरंगाबाद) : काही जणांनी शेती नसल्याने पै-पै जमवत, बॅंकेचे कर्ज घेत पाच मेंढ्यांवरून दोनशे मेंढ्यांचा कळप केला. मात्र निमोनियासदृश आजाराने दीड महिन्यात तब्बल 175 मेंढ्यांचा मृत्यू झाला. यात सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाल्याने गाढेजळगाव (ता. औरंगाबाद) येथील मेंढपाळांवर संकट आले आहे. 

मूळ गाढेजळगाव येथील मेंढपाळ काकासाहेब कोरडे हे सतरा वर्षांपासून फत्तेपुर शिवारात गट क्रमांक 32 मध्ये वास्तव्यास आहेत. अवघ्या दोन मेंढ्यांपासून त्यांनी या व्यवसायाची सुरवात केली होती. आजमितीस त्यांच्याकडे दोनशे मेंढ्या झाल्या होत्या. मात्र, दोन महिन्यात त्यांच्या 175 मेंढ्या निमोनियासदृश आजाराने मृत झाल्या.

यासोबतच गाढेजळगाव येथीलच काही मेंढ्या व पशुधन दगावल्याने पशुपालक, मेंढपाळांत घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबत वरूडचे तलाठी काशीद पाटील यांनी रविवारी (ता. 26) घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. यात शासकीय किंमतीनुसार सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी श्री. कोरडे यांनी आदर्श महिला बॅंकेकडून तीन लाखांचे तर खासगी पतसंस्थेकडून एक लाख 40 हजारांचे कर्ज घेऊन 160 मेंढ्या खरेदी केल्या होत्या. सुरवातीला मेंढ्या मृत होण्यास सुरवात होताच कोरडे यांनी कुंभेफळ व वरूड काजी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून औषधोपचारही केले. परंतु मेंढ्या दगावण्याचे सत्र थांबत नव्हते. तेव्हा खडकेश्वर येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत मेंढ्यांची तपासणी करून घेतली. त्यात रक्ताचा निमोनिया झाल्याचे दिसून आले.

यासंबंधात कुंभेफळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. गणेश सुरे यांनी सांगितले की, श्री. कोरडे यांच्या काही आजारी मेंढ्यांवर मी उपचार केले होते. तथापि, प्राथमिक उपचार करून त्यात यश आले नव्हते. मृत मेंढ्यांच्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

गाढेजळगाव ग्रामपंचायतीची नुकसान भरपाईची मागणी 

श्री. कोरडे यांच्यासह इतरही मेंढपाळांच्या मेंढ्या या कुठल्यातरी आजाराने मृत झाल्याने ग्रामपंचायतीने ठराव घेऊन संबंधितांना शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे. या ठरावात श्री. कोरडे यांच्या 171 मेंढ्यासह अशोक भालेकर यांच्या दहा ते पंधरा, मैनाजी लघुट व साहेबराव पडूळ यांच्या प्रत्येकी पंचवीस, राजू ठोंबरे व उत्तम पडूळ यांची प्रत्येकी एक गाय मृत पावल्याचा ठरावात उल्लेख आहे. ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी, तहसीलदार यांना लेखी निवेदनही देण्यात आले आहे. यात संबंधित पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com