काय आहे, जिल्हा परिषदेत वाद, राज्यमंत्र्यांना करावी लागली मध्यस्थी

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये रिक्त असलेल्या तीन सदस्यांच्या निवडीवरून शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांना सभा तहकूब करावी लागली. विशेष म्हणजे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मध्यस्थीनंतरही वाद मिटला नाही. 

विषय समिती सभापतींचे खातेवाटप व स्थायी समितीच्या तीन रिक्त जागांवर सदस्य घेण्यासाठी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. 28) दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली होती. रिक्त जांगासाठी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय चव्हाण, भाजपचे शिवाजी पाथ्रीकर, शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर, रमेश पवार, विलास भुमरे, अक्षय जायभाय, कॉंग्रेसचे केशवराव तायडे यांनी अर्ज दाखल केले. तीन जागांसाठी सात अर्ज आल्याने पेच निर्माण झाला.

शिवसेनेतर्फे चौघांनी अर्ज केले; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध झालेली आहे. ती परंपरा कायम राहावी, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, सभापती किशोर बलांडे, अविनाश गलांडे, रमेश गायकवाड यांच्यासह सदस्यांनी प्रयत्न केले; पण सदस्यांचे एकमत झाले नाही.

शेवटी चारच्या सुमारास अनेक सदस्य सभागृहात आले. केशवराव तायडे यांनी सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले; परंतु सभा तहकुबीची प्रस्ताव मांडता येत नाही, असे सांगत मधुकर वालतुरे, प्रकाश चांगुलपाये यांनी त्यास आक्षेप घेतला. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी अध्यक्षांच्या वतीने सभा तहकूब करावी, असे मत मांडले.

दरम्यान, अध्यक्ष मीना शेळके सभागृहात आल्या. प्रशासनाने सदस्य संख्या मोजली असता गणपूर्ती नसल्याचे समोर आले. त्यावरून श्रीमती शेळके यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला. या सभेत उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सभापती किशोर बलांडे, अविनाश गलांडे यांना विषय समित्यांचे वाटप होणार होते. सभा तहकूब झाल्याने वाटपही लांबले आहे. 
 
राज्यमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ 
संख्याबळाचा विचार केल्यास भाजप, कॉंग्रेस व शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी एक येऊ शकते; मात्र शिवसेनेतून दोन जागांसाठी आग्रह धरला गेला. त्यामुळे पेच निर्माण झाला. अर्ज मागे घेण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही फोन करण्यात आला; पण यानंतरही तोडगा निघाला नाही. सभा तहकूब झाल्याने अनेक सदस्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com