घरापर्यंत जायला रस्ते नाहीत अन् घरात गेल्यावर प्यायला पाणी नाही! 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : खड्डे, त्यामधून उडणारी धूळ, सतत विकत घ्यावे लागणारे पाणी अशा अनेक समस्यांमुळे पडेगावचे नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊन पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोटला; मात्र शहरात मिळतात तशा सुविधा काही उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला का वाऱ्यावर सोडले, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. पाण्याची टाकी उभारलेली आहे; मात्र अनेक वर्षांपासून त्यात पाणीच आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची भटकंती कायम आहे. 

औरंगाबादपासून दौलताबादकडे जाताना अगदी तीन किलोमीटर अंतरावर हे गाव लागते; मात्र या ठिकाणी गेल्यानंतर याला गाव म्हणावे की शहराचा भाग असा प्रश्न पडतो. रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला आत गल्ल्यांमध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. जे आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.

त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक संकटांचा सामना करीत राहावे लागत आहे. आज गावे, वाड्या, तांडे विकसित झाले आहेत. तेथे आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतात; मात्र पडेगावात घरापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत... आणि घरात गेल्यानंतर प्यायला पाणी नाही, अशी अवस्था पाहायला मिळते. 

स्मशानभूमीतून पाणी 
या गावालगत असलेल्या एका स्मशानभूमीत कायमस्वरूपी पाणी असते. म्हणून पाण्याच्या शोधासाठी इतरत्र फिरणारे लोक या स्मशानभूमीकडे वळतात. या स्मशानभूमीमधून पाणी घेऊन जातात. आमचे नशीब स्मशानभूमीतील संबंधित कर्मचारी पाणी घेऊ देतात, अशा भावनाही काही जणांनी व्यक्त केल्या. 

कृषिप्रधान संस्कृतीमध्ये वाढलेल्या १८ गावांत एकेकाळी एकोपा नांदायचा. एकाच्या पायात काटा टोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यांत पाणी यायचे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. यातच सर्वजण आपली हयात घालवायचे. प्रत्येक गावाला स्वतंत्र ओळख होती. गावातील आखाड्यात कुस्तीपटू असायचे. त्यामुळे गावचे नाव उंचावर असायचे.

विद्यापीठ जवळ असल्याने शैक्षणिक चळवळही रुजली. स्वतःची ओळख टिकवत ही गावे कात टाकू लागली. ग्रामपंचायतीचा आकार लहान असल्याने प्रत्येकजण एकमेकांना ओळखायचा. ग्रामपंचायत सदस्य दिवसातून दहा वेळा दृष्टीस पडायचा. यामुळे बायाबापड्या, लहानथोर, घरातल्या माणसांसारखे त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडायचे. नागरी समस्या त्यांच्याकडून सोडवून घ्यायचे. ग्रामपंचायतीचा जीव छोटा असला, तरी कामात फिरवाफिरवी नसायची. होत असेल तर हो म्हणायचे. नसेल तर सरळ नाही म्हणायचे. महापालिकेमध्ये गावाचा समावेश झाल्यापासून मात्र गावाचे गावपण हरवले आहे. 

कायम दुर्लक्ष 
शहरात जो विकास झाला त्या तुलनेत ही १८ खेडी कायम दुर्लक्षित राहिली. एकीकडे नारेगाव तर दुसऱ्या टोकाला भावसिंगपुरा-पडेगाव, मिटमिटा. तिसरीकडे हर्सूलगाव, तर चौथीकडे नक्षत्रवाडी-कांचनवाडी. पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर झालेला हा विस्तार महापालिकेला एका सूत्रात बांधणे कधीच जमले नाही. ग्रामपंचायतीतून महापालिकेत आल्यावर मालमत्ता कर, पाणीपट्टी वाढली. रस्ते, ड्रेनेज, नळ, पथदिवे, वाचनालय, उद्याने, सांस्कृतिक सभागृह, मंगलकार्यालय या नागरी सुविधा देणाऱ्या बाबतीत कायम परवड झाली.

या भागातील जमिनीचे भाव वाढले, त्याचा लाभ ज्याने-त्याने घेतला. सगळ्या शहराचा कचरा वाहून या अठरा गावांच्या आजूबाजूला टाकला जातोय. त्यामुळे सुविधा तर नाहीच. मात्र, दुर्गंधी वाट्याला आली. अशा भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. 

‘कशाचा विकास? सगळं भकास!’ 
उंटावर बसून या १८ खेड्यांचा कारभार हाकणाऱ्या कारभाऱ्यांना या गावांमध्ये काय हवे, काय नको, हे कधीच कळले नाही. कधी या भागात जाऊन काय समस्या आहेत, काय भावना आहेत, महापालिकेप्रती या लोकांच्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही महापालिका चालवणाऱ्यांनी केला नाही. त्यामुळेच ‘कशाचा विकास? सगळं भकास!’ अशी म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com