VIDEO : पोटाच्या खळगीसाठी शिक्षक विकतोय केळीचिप्स !

chips.jpg
chips.jpg

औरंगाबाद : कोरोनाने जीवनावर खूप मोठा परीणाम झाला आहे. मागील सहा महिन्यापासून शाळा बंद आहे. पगार मिळत नसल्यामुळे कुटुंबाची उपासमार सुरु होती. या आर्थिक विवंचनेतून सावरण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. म्हणून कमी भांडवलात केळीचे चिप्स तयार करुन विक्री करण्यास सुरुवात केली.

या व्यवसायात बेरोजगार शिक्षक मित्राची साथ मिळाली. यातून दोघांच्याही कुटुंबाच्या काही प्रमाणात गरजा भागत असल्या तरी, पुढचं भविष्य काय आणि कस असेल? याबाबत अनिश्चितता आहे, असे खासगी विनाअनुदानित शाळेवरील शिक्षक अमोल जराड सांगत होते. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर अनेक भविष्यातील चिंता स्पष्ट दिसत होती.


कोरोनामुळे मागील सहा महिन्यापासून शाळा बंद आहे. याचा सर्वाधिक परिणाम खासगी, इंग्रजी माध्यमांच्या शाळावर झाला आहे. शाळा बंद असल्यामुळे तेथे कार्यरत शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक शिक्षकांचे संसार उघडयावर पडले आहेत. शाळा कधी सुरु होईल, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे खासगी व विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे शिक्षक उपजीविकेसाठी विविध व्यवसाय करु लागले आहेत. अनेक शिक्षक भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. कोणी रंगकाम, धान्यविक्री, पेंटिंग असा व्यवसाय करुन संसाराचा गाडा ओढत आहे. तर काही शिक्षकांनी ‘गड्या! आपला गावं बरा’ म्हणत मूळगावी जावून शेतात राबणं सुरु केले आहे. पण ज्या शिक्षकांकडे शेती किंवा उपजिविकेचे कुठलेही साधन नव्हते, अशा शिक्षकांची खरी परीक्षा सुरु झाली. 

शहरातील एका खासगी संस्थेवर कार्यरत शिक्षक अमोल जराड यांनी `सकाळ’ शी बोलताना सांगीतले की, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मानधन थांबले. कुटुंबाची उपासमार होवू लागली. याकाळात काहीतरी करणे गरजेचे होते. म्हणून मित्रासोबत कमी भांडवलात केळीचे चिप्स तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. यातुन काही प्रमाणात कुटुंबाच्या गरजा भागत आहे. सध्या कोरोना संपण्याची प्रतिक्षा करीत आहोत. कोरोनानंतर शाळा सुरु होतील, तेंव्हा पुन्हा शाळेत रुजू होवू, पण सध्या ‘हे ही दिवस जातील’ या आशेवर जगत आहे, असे सांगताना चेहऱ्यावर अनेक प्रश्‍न दिसत होते. 

कोरोनाच्या काळात सर्वच लोकांना अभूतपूर्व असे अनुभव आल्याने जीवनाचे मूल्य शिकायला मिळाले आहे. त्यात प्रत्येक जण आलेल्या संकटावर मात करण्यासाठी काम करीत आहेत. त्याप्रमाणे शिक्षकही काम करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने अशा खासगी इंग्रजी व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून अनुदान देण्याची गरज आहे. शासनाने मजुरी करणाऱ्यांसाठी मोफत रेशन दिले. मात्र, खासगी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना काहीच मिळाले नाही. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना अशा आपत्तीजनक परीस्थितीत वेतन देण्यासाठी उपाययोजना करायला हवी, अशी मागणी खासगी शाळेतील शिक्षकांकडून केली जात आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com