मराठवाड्यात 2 महिन्यांत 117 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात 2 महिन्यांत 117 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

औरंगाबाद : सततचा दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव, कर्जाच्या विळख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र थांबेनासे झाले असून, नवीन वर्षात 2 महिन्यांत तब्बल 117 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. म्हणजेच दर दिवसाला दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मराठवाड्यात आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा दिलासादायक परिणाम होत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसते.

मागील चार ते पाच वर्षातील सततच्या दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्याच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढताना दिसतो. कर्जाला कंटाळून अनेक शेतकरी जीवन संपवताना दिसतात.

2015 मध्ये सर्वाधिक 1 हजार 133 आणि 2016 मध्ये 1 हजार 53 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने बॅंकांसह, खासगी सावकारांचा त्यांच्याकडे तगादा असतो. चांगले उत्पन्न घेतले तरी शेतीमालास या वर्षी भाव मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नवीन वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा 117 वर गेला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्याखालोखाल नांदेड जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. 117 पैकी 46 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. 13 शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले असून 58 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com