अतिरिक्त शिक्षकांसाठी गूड न्यूज! औरंगाबादमध्ये 50 पदे मंजूर

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद - जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये 81 शिक्षक तीन वर्षांपासून अतिरिक्त ठरले होते. दरम्यान, रिक्तपदे उपलब्ध नसल्याने या शिक्षकांना सामावून घेणे किंवा बदली करणे शक्‍य नव्हते. या समस्येची दखल घेत पटसंख्येनुसार जिल्ह्यात 50 पदे शासनातर्फे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे काही अंशी ही समस्या मार्गी
लागली असून, 31 शिक्षकांचा प्रश्‍न कायम आहे. 

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवरील अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांची समस्या सोडविण्यासाठी ज्या माध्यमिक शाळेत पटसंख्या वाढली आहे अशा शाळांमध्ये पटसंख्येनुसार मान्य होऊ शकणारी पदे मंजूर करावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी 20 ऑगस्ट 2018 पासून शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून,
पटसंख्येनुसार माध्यमिक शिक्षकांची 48 व पर्यवेक्षक दोन याप्रमाणे 50 पदे शासनाने मंजूर केली आहेत. यामुळे अतिरिक्त शिक्षकांना आता मराठवाड्याबाहेर जाण्याची गरज नसून जिल्ह्यातील रिक्त पदांवरच त्यांचे समायोजन होणार आहे. 

19 जिल्ह्यांपैकी केवळ औरंगाबादच 
मराठवाडा-विदर्भातील एकूण 19 जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या 427 माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये काही शिक्षक अतिरिक्त ठरले. मराठवाडा व विदर्भ दोन्ही विभागांतील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांच्या बाबतीत अतिरिक्त शिक्षकांची समस्या असतानाही केवळ औरंगाबाद जिल्ह्यासाठी वाढीव 50 पदे मान्य करण्यात आली आहेत. 
  
गुणवत्तेमुळे वाढली पटसंख्या 
काही शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले असले तरी दोन वर्षांपासून गुणवत्तावाढीसाठी माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी भारत विद्यालय, वाई येथे केलेला अभ्यास दौरा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेतील भरीव कामगिरी, डिझाईन फॉर चेंज उपक्रम व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्यासाठी केलेल्या उपायांमुळे बहुतांश शाळांनी प्रगती केलेली आहे. यामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांची पटसंख्या वाढली आहे. बाजार सावंगी (ता. खुलताबाद) माध्यमिक शाळेची पटसंख्या यावर्षी 105 ने वाढली आहे. शिवना (ता. सिल्लोड) माध्यमिक शाळेत विविध गावांतून विद्यार्थी येत असल्याने शाळेने स्कूल बस सुरू केली आहे. 

जिल्हा माध्यमिक शिक्षक भारतीच्या मागणीला यश 
 जिल्हा माध्यमिक शिक्षक भारतीच्या मागणीवर मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर आणि शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. निर्णयामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांच्या संचमान्यता यापुढे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याऐवजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून होणार आहे. या निर्णयाचे माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, गणेश राठोड, अमरसिंग चंदेल, बजरंग काळे, विकास तावरे, विश्वास शेळके, ईश्वर खेडकर, श्‍याम खोसरे, वंदना घुगे आदींनी स्वागत केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com