रब्बीचे 88 टक्के क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत

File photo
File photo

उस्मानाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 21.91 टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे वाफसा होण्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यातच पावसामुळे वाढलेले तण काढून शेतीची मशागत करण्यातच शेतकऱ्यांचा वेळ गेल्याने पेरणीला विलंब होत चालला आहे. अद्यापही रब्बीचे जवळपास 88 टक्के क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे एकूण क्षेत्र तीन लाख 31 हजार 496 हेक्‍टर आहे. मात्र आतापर्यंत 72 हजार 646 हेक्‍टरमध्येच रब्बीची पेरणी झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यामध्ये साधारणतः ऑक्‍टोबरमध्ये रब्बीची पेरणी होते. या कालावधीत पेरणी झाल्यास पिकांना उताराही चांगला मिळतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग या कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची काढणी करून त्याच रानात शेतकरी रब्बीची पेरणी करतात. मात्र यंदा निसर्गाने शेतकऱ्यांना दुहेरी फटका दिला. 


रब्बीसाठी शेतीची मशागत
खरीप हंगामात अपेक्षित पाऊस झाला नाही. ऐन काढणीच्या वेळी ऑक्‍टोबरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांची काढणी रखडली. दरम्यान, जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तणही वाढले. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी खरीप पिकांची काढणी करीत आहेत. दुसरीकडे तण काढून रब्बीसाठी शेतीची मशागत करावी लागत आहे. या कामांमध्येच शेतकऱ्यांचा जवळपास महिनाभराचा कालावधी गेल्याने पेरणीचे दिवसही निघून जात आहेत.

काही ठिकाणच्या जमिनीतील वाफसा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. आतापर्यंत 21.91 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र एक लाख 87 हजार 192 हेक्‍टर असून, 54 हजार 150 हेक्‍टरमध्ये म्हणजे 28.93 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. गव्हाचे 20 हजार 119 हेक्‍टर क्षेत्र असून, एक हजार 580 हेक्‍टरमध्ये म्हणजे 7.25 टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे 80 हजार 138 हेक्‍टर क्षेत्र असून, 16 हजार 267 हेक्‍टरमध्ये म्हणजे 20.30 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. 

ज्वारी, हरभरा, गहू पिकांवर भर 
ज्वारी, हरभरा, गहू ही तीन प्रमुख पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा रब्बी हंगामात भर असतो. यंदा अंतिम टप्प्यात पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बीचा हंगाम चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र पेरणीला विलंब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या पाऊस नसल्यामुळे जमिनीतील वाफसा होत असून, पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरूच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com