औरंगाबाद - आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून पालक नेहमी सतर्क असतात. त्यासाठी इंग्रजीचे शिक्षण सर्वोत्तम या भावनेतून अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देतात; पण जिल्ह्यात यंदा मोठा बदल झाला आहे. विविध उपक्रमशील प्रयोगांमुळे जिल्ह्यातील तब्बल तीन हजारांपर्यंत विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत.
गेल्यावर्षी एक हजार सहाशे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतले होते. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील 366 शाळांमधून तब्बल दोन हजार 895 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे झेप घेतली आहे. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांतून माहिती मागवली. त्यात खासगी व इंग्रजी शाळांतून मराठी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा जिल्हा परिषद शाळांचा उत्साह वाढवणारा आहे. त्यामागच्या कारणांचा शोध घेताना जिल्हा परिषद शाळांतील सुधारणांबद्दल पालकांत विश्वास वाढल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात विविध उपक्रम, डिजिटल शाळा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील दोन वर्षांपासून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर देणे, यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देत आहोत. यासाठी शिक्षण सभापती, सीईओ यांनी शाळांना आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे दक्ष पालकांकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी सकारात्मक विचार केला जात आहे.
-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
तालुकानिहाय पटसंख्या वाढ
तालुका | पट वाढलेल्या शाळा | वाढलेला पट |
औरंगाबाद | 57 | 602 |
कन्नड | 46 | 398 |
खुलताबाद | 11 | 191 |
गंगापूर | 31 | 161 |
पैठण | 50 | 417 |
फुलंब्री | 41 | 212 |
वैजापूर | 56 | 439 |
सिल्लोड | 56 | 379 |
सोयगाव | 18 | 96 |
एकूण | 366 | 2895 |
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.