मह्या पोरांवर मेंढ्या चारायची येळ नको! 

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद - ""गुरुजी, तुम्ही मह्या पोरांचे मायबाप व्हा! त्यायची काळजी घ्या, मह्या घरात धान्य ठेवलंया, गरज पडली तर तेबी घ्या; पण मह्या पोरांच्या हातात पुन्यांदा काठी आन्‌ घोंगडं घेऊन मेंढ्यामागं उन्हातान्हात फिरायची येळ येऊ देऊ नगा...'' पाणावलेल्या डोळ्यांनी धनगरवाडीतील शारजाबाई चौघुले यांनी बालरक्षक शिक्षकांकडे आपल्या भावना व्यक्त करीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आर्त साद घातली. 


स्थलांतरामुळे दरवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातून अनेक मुले शाळाबाह्य होतात. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर व शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात बालरक्षक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत चार हजारांपेक्षा जास्त मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. 


स्थलांतर रोखण्यासाठी बालरक्षकांमार्फत प्रत्येक गावात जाऊन सभा, बैठका घेऊन पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जातो. अशीच एक सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी, केंद्र नागद (ता. कन्नड) येथील धनगरवाड्यावर झाली होती. 


या पालक सभेत मुलांची जबाबदारी, त्यांचा शिक्षणाचा खर्च आम्ही करू; परंतु मुलांना शाळाबाह्य करू नका, असे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल पालकांना सांगत होते. त्यावेळी अनेक पालकांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला. हे एका कोपऱ्यात बसून शारजाबाई चौघुले ऐकत होत्या. सभा संपल्यानंतर धावत-पळत बालरक्षकांकडे येत त्यांनी आपल्या मनातील खंत त्यांच्यापुढे मांडली. तेव्हा त्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या. डोळे पुसत हुंदके देतच त्या म्हणाल्या,

""गुरुजी, मला दोन पोरं हाईत. त्यांनाबी शाळंत जायची लई इच्छा असती; पण आमचं हातावरचं पोट हाय. तुम्हीच मह्या पोरांचे मायबाप व्हा! त्यायची काळजी घ्या, मह्या घरात काही धान्य ठेवलंय. गरज पडली तर तेबी घेऊन पोरास्नी खाऊ घाला. त्यांना शिकवून मोठ्ठं सायब करा.'' शारजाबाई आपली कैफियत मांडत असताना उपस्थित शिक्षकही काही काळ स्तब्ध झाले. इच्छा असूनही केवळ परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नसलेली अनेक मुले परिसरात असतात. त्यांच्या पालकांच्या मनातही शिक्षणाविषयी अशीच ओढ निर्माण व्हायला हवी, अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. 


दानशूरांचा पुढाकार 
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून प्रतिविद्यार्थी सहा महिन्यांसाठी आठ हजार पाचशे रुपये खर्च केला जातो. हा निधी अत्यल्प आहे. दरम्यान, समाजातील काही दानशूर शिक्षणप्रेमी या मुलांचा खर्च उचलण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या मदतीने मुलांचे तीनवेळचे जेवण, तेल, साबण, कपडे, पेन, वह्या, पुस्तके तसेच प्राथमिक खर्च भागवला जातो. शिक्षणापासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात 42 पेक्षा जास्त हंगामी वसतिगृहांची स्थापना करण्यात आली आहे. पाचशेपेक्षा जास्त मुलांना ईजीएस कार्ड (रोजगार हमी योजना) देऊन शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याची पूर्वतयारी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com